Ramdas Athawale: ...त्यामुळे उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत : रामदास आठवले
Rramdas Athawale On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळता आले नाही, त्यामुळे ते पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची विरोधी पक्षांकडून आतापासून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी (Ramdas Athawale) उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. आपल्या देशात पंतप्रधानपदाचे 15-20 उमेदवार आहेत. नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करणे येड्यागबाळ्याचे काम नाही, लोकांची कामे केली असल्याने आम्हाला 2024 ला यश मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळता आले नाही, त्यामुळे ते पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
राज्यातील कांदा प्रश्नावरही रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाफेडकडून कांदा खरेदीसाठी सरकारने निर्णय घेतला आहे. कांद्याला दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कांद्याचा दर फिक्स होणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना लोकांची सहानभूती आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्याने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. याला लोकांचा पाठिंबा आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडूनसुध्दा पाठिंबा मिळेल. "
"कसबा निवडणुकीत यश मिळाले असले तरी महाविकास आघाडीने हूरळून जावू नये. कर्नाटक, राजस्थान निवडणुकीत देखील भाजपाला यश मिळेल. नागालॅंडमध्ये आरपीआयने आठ जागा लढवल्या होत्या. त्यात आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. कर्नाटक आणि राजस्थानमध्ये देखील आरपीआय निवडणूक लढणार असून तेथेही आम्हाला चांगले यश मिळेल, असा विश्वास यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केला. दरम्यान, रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. "सध्या अर्वाच्च भाषा वापरली जात आहे, हे योग्य नाही. त्यामुळे सरकार विरोधात बोलले तर जीव जातो या अशोक चव्हाण यांच्या मताशी मी सहमत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
"सरकार लोकांच्या बाजूने आहे. महागाई कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तीन वर्षापासून लोकांना स्वस्तात अन्नधान्य दिले जात आहे, असे रामदास आठवले म्हणाले.