अहमदनगर : शिक्षण पूर्ण केल्यावर तरुण नोकरीच्या शोधात वणवण फिरताना दिसतात. मात्र, राहुरी तालुक्यातील युवकांनी एकत्र येत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आणि आज तीन वर्षांनंतर निर्यातदाराच्या माध्यमातून चिलापी जातीचे मासे थेट निर्यात होत असून अहमदनगर जिल्ह्यातील मासे दक्षिण आफ्रिकेला रवाना झालेत. 150 टन मासे विक्रीतून 80 ते 90 रुपये प्रतिकिलो भावानुसार सुमारे साडे बारा लाख रुपये एकूण उत्पन्न मिळणार आहे. खर्च वजा जाता निव्वळ नफा 5 लाख रुपये होणार आहे.


अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाच्या विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयात मत्यविभागाच्या सहकार्याने केज फिश फार्मिंग अर्थात पिंजरा पध्दतीने मत्यपालन केलं जातय. मुळा धरणाच्या जलाशयात जवळपास 80 च्या वर पिंजरा मत्यपालन करणारे प्रकल्प उभे राहीले आहेत. अनेक युवकांनी एकत्र येत या व्यवसायाला प्राधान्य दिले असून मत्स्यपालन व्यवसाय यशस्वीपणे सांभाळतायेत.जलविस्तार क्षेत्रात लहान आकाराचे मत्स्यबिज योग्य प्रमाणात सचंयन करुन त्यांना अनुकूल वातावरण आणि खाद्य पुरवून त्यांना विक्रीयोग्य आकारात वाढविले जावुन त्यांची   विक्री केली जातेय. या मत्स्य संवर्धन व्यवसायात अनेक उच्च शिक्षीत तरुणही आता उतरले आहेत. गोड्या पाण्यातील ह्या चिलापी काळ्या आणि गुलाबी माशांना महाराष्ट्रातुन मोठी मागणी असते. समुद्री माश्यांप्रमाणे आता गोड्या पाण्यातील माशांनाही देशांतर्गत आणि विदेशातुन मोठी मागणी वाढु लागली आहे. चिन आणि इंडोनेशीया सारख्या देशांची माश्यांच्या निर्यातील मक्तेदारी आता भारत मोडु पहात असून नगर जिल्ह्यातील मासे आता थेट दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत. 150 टन ऑर्डर मिळाल्यानंतर मत्स्य उत्पादक आनंदी झाले आहेत. परदेशात विक्री करण्याबरोबर लाईव्ह फिशिंग विक्रीसुद्धा लवकरच सुरू करणार असल्याचं मत्स्य उत्पादक अडसुरे यांनी सांगितले आहे.


राज्याच्या आणि केंद्राच्या मत्स्य संवर्धन विभागाकडुन पिंजऱ्यातील (केज) मत्स व्यवसायासाठी साठ टक्के सबसीडी दिली जातेय. अर्थात हा प्रकल्प उभारण्याचा एका मध्यम युनिटचा खर्चही जवळपास सत्तर लाखाच्या आसपास येतो. मात्र, वर्षाकाठी पंचवीस लाख उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायाकडे अनेकांचा ओढा वाढत असल्याच दिसू लागलं असल्याचे मत्स्य पालन संवर्धन विभागाचे सहायक अधिकारी जनक भोसले यांनी सांगितले.


गेल्या दीड वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात मत्य व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यानंतर आता मुळा धरणात मत्स्यपालन व्यावसायीकांनी थेट परदेशात माशांची निर्यात सुरु केली आहे. सध्या एका निर्यातदारामार्फत दीडशे टन माशांची ऑर्डर मिळाल्यानंतर हा माल मुंबईमार्गे थेट दक्षिण अफ्रिकेत पाठविण्यास सुरवात झालीय. भारतीय बाजारात 120 रुपये प्रतिकिलो दर मिळाला असता मात्र रिटेलमध्ये विकताना नुकसान जास्त होते म्हणून मोठी ऑर्डर असल्यानं कमी वेळेत योग्य नफा मिळवून विकणे फायदेशीर असल्यानं निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.