Maharastra Narayan Rane Jan Ashirwad Yatra : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. नारायण राणे म्हणाले की,  आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार, असं राणे म्हणाले. सोबतच केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? असा सवाल देखील त्यांनी केला. 


 वरुण सरदेसाई परत आल्यास परत जाणार नाही
नारायण राणे म्हणाले की, माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे. 39 वर्षे सोबत होतो. शिवसेना औषधाला शोधून मिळू नये याची काळजी घ्या, असं राणे म्हणाले.  वरुण सरदेसाई परत आल्यास परत जाणार नाही. आमच्या घरावर कुणी आल्यास आम्ही सोडणार नाही, असंही राणे म्हणाले.  विधायक विकासाची काम आम्हाला करायची आहेत. आम्हाला घरात बसून कारभार नाही करायचा. धमक्या नारायण राणेंना नका देऊ. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे. मी ३९ वर्षे होतो सोबत. जवळून सर्व माहिती आहे. त्यामुळे आमच्या वाटेला येऊ नये, असंही ते म्हणाले. 



राणे म्हणाले की,  कोकणच्या शेतकऱ्यांना माझ्या खात्याचा फायदा होईल असा प्रयत्न करणार आहे. एका महिन्याच्या आत बैठक घेऊन प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. अजून दोन दिवस दौरा आहे, आठवडा फिरून घसा बसला आहे, त्यामुळं आता जास्त बोलत नाही, असं ते म्हणाले. 



संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली.  त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गुरूवारी अर्थात काल लाँग मार्च देखील काढण्यात आला होता. तसेच सध्याच्या घडीला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग देखील करण्यात येत आहे.