Buldhana News :  जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था अनेक उदाहरणातून पुढे आली आहे. अशातच आणखी एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून (Zilla Parishad School) पुढे आला आहे. यात गावातील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या (10th) विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक असल्याने सर्व विषय शिकवण्याची मदार एकच शिक्षकावर असल्याचे समोर आले आहे.


परिणामी, शाळेत इतर शिक्षक नसल्याने विद्यार्थी महामार्गाने चालत गट विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार करण्यासाठी निघाले आहेत. यासाठी शालेय विद्यार्थी पायी चालत चक्क पाच किमीटरवर असलेल्या जळगाव जामोद येथील गट विकास अधिकारी यांच्याकडे निघाले आहेत. त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील असालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था नव्याने पुढे आली आहे.


विद्यार्थ्यांवर पायी मोर्चा काढण्याची वेळ


विद्यार्थी जीवनात दहावीचे वर्ष अतिशय महत्वाचे मानल्या जातं. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ एकच शिक्षक  आसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आज जळगाव जामोद पंचायत समिती येथील गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाण्याचा ठरवलं. त्यानुसार जिल्हा परिषद आसलगाव येथील शाळेतील सर्व विद्यार्थी पायी चालत महामार्गाने धोकादायक पद्धतीने प्रवास करत जळगाव जामोदसाठी निघाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद आसलगाव येथील शाळेत रिक्त पद आहेत . सध्या दहावी या वर्गासाठी स्वतः मुख्याध्यापक सर्वच विषय शिकवत असल्याने इतर विषयांसाठी शिक्षक नाही . त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गट विकास अधिकारी यांना भेटण्यासाठी जळगाव जामोद येथे पायी मोर्चा काढण्याची वेळ आलीय.


दोन महिने उलटूनही शाळेतील विद्यार्थी पाठ्यपुस्तकाविना


शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र कल्याण डोंबिवली मनपा शाळेतील विद्यार्थी दप्तर, पाटी पुस्तकाविनाच शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. मनपा शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळण्यासाठी वारंवार मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला, सूचना केल्या. मात्र अद्यापही विद्यार्थी  पाठ्यपुस्तकाविना असल्याने मनसेने मनपाच्या शिक्षण मंडळावर अनोखे आंदोलन केले आहे.


शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांना शाळेचे दप्तर गणवेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा देण्याची आठवण राहावी यासाठी हे अनोखे आंदोलन केले आहे. येत्या आठवडाभरात विद्यार्थ्यांना गणवेश दिला नाही तर, अधिकार्‍यांना गणवेश घालून विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या