Breaking News LIVE : मुंबईहून कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅंकर झाला लीक

Breaking News LIVE Updates, 05 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2021 07:00 PM
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाला शासन मान्यता 

सातारा :  कर्मवीर डाॅ. भाऊराव पाटील यांच्या नावाने समूह विद्यापीठ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात या विद्यापीठात साता-यातील तीन महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. राज्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. संस्थेचे राज्यस्तरीय समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले, समूह विद्यापीठासाठी लागणारा निधी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत 33 कोटी रुपये केंद्र शासन आणि 22 कोटी रुपये राज्य शासन असा एकूण 55 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल.



रयत शिक्षण संस्थेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच 30 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. यासाठी पदभरती करणे आवश्यक आहे. या पदभरती प्रक्रियेला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांकडे पुरेशा शैक्षणिक, भौतिक व तांत्रिक पायाभूत सोयीसुविधा आहेत अशा 3 ते 5 विद्यमान महाविद्यालयांची संसाधने एकत्रित करुन, ही विद्यापीठे निर्माण करण्याकरिता तसेच विद्यापीठाचे विविध दर्जात्मक मापदंड मोठ्या प्रमाणात दर्शवून गुणवत्तेचा दर्जा राखण्यात समर्थ असलेल्या महाविद्यालयांचा समावेश करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.



शासनाच्या मान्यतेच्या वृत्ताबाबत संस्थेचे  चेअरमन व कर्मवीरांचे पणतू डाॅ. अनिल पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, "पारंपरिक विद्यापीठांपेक्षा या विद्यापीठाचा अभ्यासक्रम वेगळा असेल. येथे अॅकॅडमीक पेक्षा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य असेल. विद्यार्थ्याला कोणतं कौशल्य आत्मसात करायचं आहे, त्यादृष्टीने अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला या ठिकाणी असणार आहे."


पहिल्या टप्प्यात साता-यातील छत्रपती शिवाजी काॅलेज, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय आणि धनंजयराव गाडगील वाणिज्य महाविद्यालय या तीन स्वायत्त महाविद्यालयांचे मिळून हे विद्यापीठ असेल. या तिन्ही महाविद्यालयांना 'नॅक'चा सर्वोत्कृष्टतेचा  A+ हा दर्जा आहे.

बीडमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा

 


कोरोनाच्या महामारीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बीड शहरात आंदोलन करणारे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व अन्य 10पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यावर शिवाजी नगर पोलिसात जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे


 विनायक मेटे यांनी उभारलेल्या कोईड सेंटरचे उदघाटन करण्यासाठी बीडमध्ये विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी बीड मधील भाजपा कार्यालया समोर पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तेथील सरकारचा निषेध केला या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवून जिल्हात लागू असलेल्या जमाव बंदीचे उल्लंघन केले म्हणून शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रेमडीसीविर वाटपावरून काही मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

- आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रेमडेसिविर वाटपावरून काही मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी,
- रेमडेसिविरचं जिल्हा निहाय होणारं वाटप योग्य प्रमाणात होत नसल्याचा काही मंत्र्यांचा आक्षेप,
- वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यात जास्त रेमडेसेवीर देत असल्याचा आक्षेप,


- एकीकडे केंद्र सरकार मंजूर केलेल्या प्रमाणात रेमडेसिविर देत नाही,
- दुसरीकडे जो काही स्टॉक मिळतो त्याचे जिल्हानिहाय योग्य वाटप झाले पाहिजे अशी मागणी काही मंत्र्यांनी केली,


- केंद्राकडून 9 मे पर्यंत राज्याला अजून तीन लाख 20 हजार रेमडेसिविर मिळणे बाकी आहे,
मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने मंत्र्यांमध्ये केंद्र सरकारबाबतही नाराजी,

मुंबईहून कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅंकर झाला लीक

Breaking News LIVE :  मुंबईहून कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅंकर झाला लीक,  पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हद्दीतील घटना,  सातारा पोलीस घटनास्थळी दाखल, ओव्हरलोडमुळे लीकेज, पोलिसांची माहिती 

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळली

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात कारचा अपघात, सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली कार,  मुंबई-पुणे हायवेवरील बॅटरी हिलनजीक दरीत कोसळली कार, कारचालक मंगल चौहान गंभीर जखमी, एमजीएम रुग्णालयात दाखल, पत्नी आणि दोन मुले किरकोळ जखमी...

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळली

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात कारचा अपघात, सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली कार,  मुंबई-पुणे हायवेवरील बॅटरी हिलनजीक दरीत कोसळली कार, कारचालक मंगल चौहान गंभीर जखमी, एमजीएम रुग्णालयात दाखल, पत्नी आणि दोन मुले किरकोळ जखमी...

अकोला : वैद्यकीय महाविद्यालयातील 120 प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचं काम बंद आंदोलन, 50 हजार मानधनाची मागणी

अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील 120 प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचं दुपारनंतर काम बंद आंदोलन सुरू. कोविड वार्डात काम करण्यास नकार. महिन्याला फक्त 11 हजार मानधन मिळत असल्याने मूंबईच्या धर्तीवर 50 हजार मानधनाची मागणी. सोबतच विमा कवच आणि सेवा देतांना मृत्यू झाल्यास जबाबदारी घेण्याची मागणी. प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांच्या आंदोलनामुळे रूग्णालयाचं काम कोलमडण्याची शक्यता.

बुलढाणा : नांदुरा येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकत 10 रेमडेसिवीर इंजेक्शनसह 3 जण ताब्यात

बुलढाणा : नांदुरा येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकून 10 रेमडेसिवीर इंजेक्शनसह 3 जणांना ताब्यात घेतलं. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. इंजेक्शनचा काळा बाजार एका घरातून होत असल्याची माहिती होती. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन व पोलीस करत आहेत.

सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच, राज्य सरकारचा आरोप

सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच, राज्य सरकारचा आरोप,


सीबीआयच्या एफआयआरमधील दोन भाग वगळण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका,


सीबीआय हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांच्या पलिकडे जाऊन तपास करू पाहतंय - राज्य सरकार,


सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणं आणि काही पोलीस अधिका-यांच्या बदल्यांबाबत सीबीआयच्या एफआयआरमध्ये असलेल्या उल्लेखावर राज्य सरकारचा आक्षेप,

खासदार संभाजीराजे  छत्रपती यांचं मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र

कोल्हापूर - खासदार संभाजीराजे  छत्रपती यांचं मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांना पत्र, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल मराठा समाजासाठी दुर्दैवी, मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही

खासदार संभाजीराजे  छत्रपती यांचं मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र

कोल्हापूर - खासदार संभाजीराजे  छत्रपती यांचं मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांना पत्र, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल मराठा समाजासाठी दुर्दैवी, मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही

मुरबाड : वादळ, गारपिटीने नुकसान झालेल्या भागात खासदार कपिल पाटील यांची पाहणी

मुरबाड : वादळ, गारपिटीने नुकसान झालेल्या भागात खासदार कपिल पाटील यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देऊ केली. मुरबाड तालुक्यातील लोत्याची वाडी, मेर्दी  येथील अनेक वाड्यांमध्ये चक्रीवादळ व गारपीट मोठ्या प्रमाणावर झाली असून अनेक घरांचे नुकसान झाले होते. काही घरांचे तर शंभर टक्के नुकसान देखील झाले होते. नुकसानग्रस्त ठिकाणी खासदार कपिल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्काळ मदत म्हणून नुकसानग्रस्तांना मोरेश्वर हलोजी पाटील ट्रस्ट व कपिल पाटील फाऊंडेशन यांच्यामार्फत 10 हजारांची मदत ही करण्यात आली.

पाण्याच्या डबक्यात पडून मुलाचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील लाल पूल ते कोर्ट रोड दरम्यान असलेल्या खुल्या जागेत गोळा झालेल्या पाण्याच्या डबक्यात पडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दीक्षांत गवई असे मृत बालकाचे नाव आहे. डबक्या शेजारी खेळत असताना तो डबक्यात पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने अचलपूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे

पाण्याच्या डबक्यात पडून मुलाचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील घटना

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील लाल पूल ते कोर्ट रोड दरम्यान असलेल्या खुल्या जागेत गोळा झालेल्या पाण्याच्या डबक्यात पडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. दीक्षांत गवई असे मृत बालकाचे नाव आहे. डबक्या शेजारी खेळत असताना तो डबक्यात पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने अचलपूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.

बारामतीत सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात

बारामतीत मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे. या लाॅकडाऊनमधे मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. यात दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. हा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. 5 ते 11 मे दरम्यान हा कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात किराणा, भाजी मंडई बंद राहणार आहे. 

नागपूरमधील लकडगंज परिसरात फर्निचर कारखान्याला आग

नागपूरमधील लकडगंज परिसरात आरा-मशिन, फर्निचर कारखान्याला आग लागली असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. आज सकाळी आठच्या सुमारास आग लागली होती.

मराठा आरक्षण अंतिम निकालाआधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य आणि वकील यांच्यात बैठक

मराठा आरक्षण संदर्भात आज अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात सुनावला जाणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी साडेनऊ वाजता मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य आणि वकील यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमधील मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत.

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर यांचं नाशिकमधील राहत्या घरी निधन

ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर यांचं आज पहाटे 5 वाजता राहत्या घरी निधन झालं, ते 97 वर्षांचे होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते. महात्मा गांधीजींच्या स्वदेशी, सत्याग्रह आशा वेगवेगळ्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतर नव्या पिढीमध्ये देशाभिमान जागावणे, खादीचे कपडे, व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी कार्य त्यांनी केले. नाशिकच्या हुतात्मा स्मारकाचा त्यांनी कायापालट केला होता, तरुणांना शिस्त स्वावलंबनाचे धडे दिले. अनेक अधिकारी घडवले. आदिवासी दुर्गम भागातील अनेक मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली. गोरगरीब होतकरु मुलांना हुतात्मा स्मारकात राहणायची सोय हुदलीकर बाबांनी करुन दिली. त्यातील असंख्य तरुण आज प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. अधिकारी, लोकप्रतिनिधी हे मालकासारखे वागत असले तरी ते आपले नोकर आहेत, याची जाणीव ते पदोपदी करुन देत होते. त्यांच्या जाण्याने स्वातंत्र्यलढ्यातील साक्षीदार हरपला असून सर्व स्थरातून शोक व्यक्त होत आहे.

सहा महिन्यांची गर्भवती असूनही कोरोना रुग्णांची काळजी घेणारी कोविड योद्धा!

कल्याण : कोरोना काळात डॉक्टरांनी दिवसरात्र काम करत रुग्ण सेवा केली आहे. डॉक्टरांनी देवदूत होऊन अनेकांचे प्राण वाचवले आहेत. मात्र बदलापूर शहरातील गौरी हॉल याठिकाणी असलेल्या पालिकेच्या कोविड रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या महिला डॉक्टरची या निमित्ताने विशेष दखल घ्यावीच लागेल. डॉक्टर रुपाली मोहिते असे या तरुण डॉक्टरांचे नाव आहे. रुपाली या सहा महिन्यांच्या गर्भवती असतांना सुद्धा कोविड रुग्णालयात 8 तास सेवा देत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तर दुसरीकडे ड्युटी संपल्यावर आपल्या होणाऱ्या बाळाची आणि घरच्यांची देखील काळजी घेत आहेत. रुग्ण सेवा करताना त्यांना देखील कोरोनाची लागण झाली, मात्र त्यावर मात करून त्यांनी पुन्हा कोविड रुग्णालयात रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला. कोविड रुग्णालयातील डॉक्टर सहकाऱ्यांसह कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे ही सेवा करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय मागे, जनता कर्फ्यू पाळण्याचं प्रशासनाचं आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन नाही मात्र जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार होते. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मागे घेत जनता कर्फ्यूचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

बेळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर खासगी रुग्णालयाच्या मदतीला, 21 कोरोना रुग्णांचे प्राण

बेळगाव शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन नसल्यामुळे मोठी समस्या उद्भवली होती. परिस्थिती बिकट होती. तेव्हा खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बिम्सच्या  (जिल्हा रुग्णालय)डॉक्टरांशी संपर्क साधला. बिम्सचे डॉक्टर त्यांच्या मदतीला मध्यरात्री धावून गेले आणि त्यांना बिम्समध्ये दाखल करुन त्यांचे प्राण वाचवले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. खासगी दवाखान्यातील आणि सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर कोरोनाशी सर्व शक्तीने लढा देत आहेत. त्यामुळेच 21 रुग्णांचे प्राण वाचले. डॉक्टरांनी एकमेकांना सहकार्य केल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचले असे बिम्सचे संचालक डॉ. विनय दस्तीकोप यांनी सांगितले. बिम्समध्ये तीनशे बेडचा एक ब्लॉक असून तेथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत तिथे 287 रुग्ण उपचार घेत होते. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आणखी एक ब्लॉक कोरोना रुग्णांसाठी सुरु करण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ.विनय दास्तीकोप यांनी दिली.

औरंगाबाद : मुलाच्या लग्नात गर्दी जमवल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वाघचौरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

औरंगाबाद : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सत्ताधारी मात्र गंभीर नाहीत. याची प्रचिती औरंगाबादेत आली. औरंगाबादेत पैठणचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वाघचौरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात गर्दी जमवल्याचं समोर आलं. मंगळवारी त्याच्या मुलाचा विवाह औरंगाबाद जवळील चित्तेपिंपळ गाव गावात झाला, यावेळी मंत्री संदीपान धुमरे ही उपस्थित होते. या लग्नाला बरीच मंडळी हजर होती. याबाबत आता चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तर मंगल कार्यालयाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. तपासअंती संजय वाघचौरे यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असे पोलिसांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनचा फटका जळगाव जिल्हा दूध संघाला, विक्रीत 30 ते 40 टक्के घट

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये दूध विक्री करण्याच्या वेळा निश्चित करुन दिल्या आहेत. मात्र तरीही अनेक नागरिकांनी दूध खरेदीकडे पाठ फिरवल्याने आणि हॉटेल व्यवसाय बंद असल्याने त्याचा थेट परिणाम म्हणून दूध संघाच्या विक्रीत तीस ते चाळीस टक्के घट झाली आहे. दूध संघाकडे मोठा साठा शिल्लक राहत असल्याने या दुधाचे करायचं तरी काय असा प्रश्न संघाला पडला आहे. जळगाव दूध संघ दोन्ही वेळेस मिळून तीन लाख लिटर दूध संकलित करत असतो. मात्र सध्या यातील दीड लाख लिटर दूध रोजच शिल्लक राहत असल्याने या दुधपासून दूध भुकटी आणि बटर बनवण्याचा प्रयत्न जिल्हा सहकारी दूध संघाने केला आहे. मात्र या दोन्ही गोष्टीला बाजारपेठ आणि बाजारभाव नसल्याने प्रतीलिटर दोन रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने दूध संघाच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या 1200 मेट्रिक टन इतका प्रचंड दूध भुकटीचा साठा दूध संघाकडे शिल्लक आहे. त्यामुळे इथून पुढे तयार होणारी दूध पावडर कुठे ठेवायची असा प्रश्नही संघाला आता सतावू लागला आहे. आगामी काळातही लॉकडाऊन वाढला आणि पुन्हा निर्बंध लावण्यात आले तर मात्र दूध खरेदीचे भाव कमी करुन दूध संघ तोटा कमी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या शिल्लक राहत असलेले दूध सरकारने पूर्वीप्रमाणे महानंदा माध्यमातून खरेदी केले तर जिल्हा सहकारी दूध संघाचा तोटा कमी करता येणे शक्य असल्याचं मत दूध संघाचा वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

जालन्यात कोरोना रुग्णाचे दवाखान्यातून पलायन, दुचाकीवरुन जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू

जालना जिल्ह्यात कोविड रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोना रुग्णाचा दुचाकीवरुन जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालना शहरातील भाग्यनगर भागात राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल चार  दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल दुपारच्या सुमारास त्याने रुग्णालयातून पळ काढला. परंतु औरंगाबाद रोडवर दुचाकीवरुन जाताना पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन टँकर चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार
मराठा आरक्षणाबाबतचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी 10.30 वाजता निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. 1992 मधील इंदिरा साहनी खटल्याप्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे की नाही आणि इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे की नाही, याचं परीक्षण करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.


राज्यात मंगळवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांचा आकडा जास्त
राज्यात लॉकडाऊन लावल्याचा थोडाफार परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात मंगळवारी 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे काल राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे. राज्यात काल 891 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटलांची बाजी, तीन दशकांनंतर सत्तांतर
कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या गोकुळ दूध संघाच्या अवतीभवती फिरत त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीला 21 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता आता संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे साधारण दीड वर्ष रखडलेल्या गोकुळच्या या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान पार पडलं. एकूण 3 हजार 547 मतदार असलेल्या या गोकुळ दूध संघात कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर 99.78 टक्के इतकं मतदान पार पडलं होतं. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.