Breaking News LIVE : परभणीत पुन्हा संचारबंदीचे आदेश

Breaking News LIVE Updates, 22 March 2021:

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2021 07:07 AM
चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या बोराडे लॉनवर पोलिसांची धाड

चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या बोराडे लॉनवर पोलिसांची धाड. साथरोग कायदा धाब्यावर बसवून केली जात होती पार्टी, स्थानिक गुन्हे शाखेने 2 आयोजकांविरोधात दाखल केला गुन्हा, पार्टीतील डीजे व अन्य साहित्याची केली जप्ती, एकूण 40 मुले-मुली होती पार्टीत सहभागी, ही एक बॅचलर्स पार्टी असल्याची प्राथमिक माहिती, दारु-ड्रग्जचा वापर यासंदर्भात आयोजकांकडून केली जात आहे विचारपूस, रामनगर पोलिस करत आहेत प्रकरणाचा अधिक तपास

..तर खासदारकीचा राजीनामा द्या : रुपाली चाकणखर

नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे : रुपाली चाकणखर

पोलीस ठाण्यातील भंगार विक्री प्रकरणात महिला कर्मचारी निलंबित

वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचे भाग काढून एकूण 10 ते 12 टन भंगार विक्री विना परवानगी करण्यात आली होती. विक्री मात्र हे भंगार एक एक करून वाहनात नेताना वसई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांच्या निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या बाबत वसई पोलिसांतर्फे खात्याअंतर्गत तपास सुरु होता. तपासादरम्यान दोषी आढळल्याने वसई पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून मंगल गायकवाड या महिला कर्मचाऱ्यावर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. मंगल या वसई पोलीस ठाण्यात मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांची 2012 साली बदली झाली होती मात्र त्याला स्थगिती दिल्यामुळे त्या वसई पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत. भंगार विक्री केलेला मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांनी सांगितले.

आज दिवसभरात रायगड जिल्ह्यात ४०० कोरोनाबधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात रायगड जिल्ह्यात ४०० कोरोनाबधित रुग्णांची नोंद, पनवेल तालुक्यात सर्वाधिक ३४५ रुग्णांची नोंद, खालापूर येथे १३, पेण १०,  कर्जत ११  रुग्ण आढळले

परभणीत पुन्हा संचारबंदीचे आदेश

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जिल्ह्यात 24 मार्च सायंकाळी 7 ते 31 मार्च च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी. 6 दिवस परभणी जिल्ह्यात संचारबंदी

यवतमाळ कोरोना अपडेट्स

जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण पॉझेटिव्ह. 305 जण कोरोनामुक्त. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1965 सक्रिय रुग्ण. आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 24840. बरे झालेल्यांची एकूण संख्या  22302, जिल्ह्यात एकूण 573 मृत्युची नोंद

इमारतीवरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न फसला, पण घरात जाऊन घेतला गळफास

इमारतीवरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न फसला, पण घरात जाऊन घेतला गळफास कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथील धक्कादायक प्रकार. स्थानिक तरुणांनी संबधित तरुणाला वाचवलं होतं, पण घरी गेल्यावर त्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती.

उल्हासनगरमध्ये दोन विवाह कार्यालयावर पालिकेची दंडात्मक कारवाई, शेकडो माणसांच्या उपस्थितीत सुरु होते लग्न सोहळे

उल्हासनगर शहरात  कोविड रुग्णांच्या आकड्याने शंभरी गाठली असली तरी आजही नागरिक बेजबाबदार पणे वागताना दिसत आहेत. शहरात शेकडो माणसांच्या उपस्थित लग्न सोहळे सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेने  अशा कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विवाह कार्यालयावर कारवाईस सुरुवात केली आहे. काल शहरातील कॅम्प नंबर 2 भागातील मोनिका मॅरेज हॉल आणि हीरा मॅरेज हॉल या दोन विवाह कार्यालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 50 माणसांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्याचे शासनाचे निर्देश असताना या दोन्ही कार्यालयांमध्ये शेकडो माणसांच्या  उपस्थितीत लग्न सोहळे सुरु होते . त्यामुळे पालिकेच्या पथकाने या दोन्ही विवाह कार्यलयावर  कारवाई केली हीरा मॅरेज हॉलवर 40 हजार तर मोनिका मॅरेज  हॉल मालकावर वीस हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसच यापुढे जर अशा प्रकारच्या लग्न सोहळा पुन्हा  कार्यालयामध्ये झाला तर हॉल सील करण्यात येणार असल्याचे  महापालिकेने सांगितले. 

नाशकात अवकाळी पावसाने कांद्याचं नुकसान, शेतकरी चिंतेत

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाने 15 मिनिटं जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील गोराणे, तरहाबाद, जायखेडा, हरणबारी, मुल्हेर या परिसरात पावसाने हजेरी लावली. 2 दिवसांपूर्वी मुल्हेर, अंतापूर तर काल तळवडे दिगर या परिसरात पाऊस झाला होता. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

बीड : आम आदमी पार्टीचे नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण
बीड नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर अंधारात आहे. शहर अंधारात असताना नगरपालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत असून नगर पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण सुरु केलं. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नुसताच विकासाचा दावा केला जात असतो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात अंधार असल्याने नगरपालिका प्रशासन नेमकं काय करत आहे, असा प्रश्‍न शहरातील नागरिकांना पडला आहे. 

 
बीड : परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 4 एप्रिलपर्यंत बंद
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बंदचा हा कालावधी आणखी वाढवण्यात आला असून येत्या 04 एप्रिलपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज नवे आदेश काढले आहेत. प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे गर्दी होण्याची श्यक्यता लक्षात घेता महाशिवरात्रीच्या अगोदर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर बंदचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. पुढील 04 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. मंदिर जरी बंद असले तरी दैनंदिन पूजा विधी पुजाऱ्यांच्या मार्फत चालू असणार आहे.
लोकसभेत शून्य प्रहरात गिरीश बापट, मनोज कोटक, पूनम महाजन, कपिल पाटील, नवनीत राणा यांची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी

लोकसभेत शून्य प्रहरात गिरीश बापट, मनोज कोटक, पूनम महाजन, कपिल पाटील, नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा सुरू आहे. राज्यात स्वैराचार सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अश्या गोष्टी घडत आहेत. म्हणून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. याला शिवसेनेच्या खासदारांनी जोरदार विरोध केला. भाजप खासदारांना बोलायला वेळ दिला पण सेनेकडून फक्त विनायक राऊत यांनाच बोलण्याची संधी दिली म्हणून शिवसेना खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला.

परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका,

परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, परमबीर सिंह यांची मागणी

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर 50 जणांवर गुन्हा दाखल

काल पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपाने महाविकास आघाडी सरकारच्या या विरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्यासह 50 जणांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार जगदीश मुळीक योगेश टिळेकर यांच्यासह पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते अशा पन्नास जणांविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करीत घोषणाबाजी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

 


मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज (दि २२) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.


पोलीस आयुक्त पदाचा  कार्यभार स्विकारल्यानंतरची  हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी असं कोणतंही कारण सध्यातरी नाही : हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ : राष्ट्रपती राजवट लागू करायला काही कारणं सविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिली आहेत. असं कोणतंही कारण सध्यातरी नाही. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य होतं, पण काँग्रेसने तसं केलं नाही. राज्यपालांना आज प्रकाश आंबेडकर भेटले उद्या रामदास आठवले भेटतील. लोकशाहीत कोणी काही मागणी करावी याला बंधन नाही.

डोंबिवलीतील कोपर येथील पुलाच्या गर्डरच्या कामाला आज सुरुवात होणार

डोंबिवलीतील कोपर येथील पुलाच्या गर्डरच्या कामाला आज सुरुवात होणार, औरंगाबादहून एकूण सात गर्डर डोंबिवलीत दाखल, मे अखेर पर्यंत कोपर पुलाचं काम पूर्ण होणार असल्याची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची माहिती

 कसारा-खर्डी दरम्यान पंचवटी एक्सप्रेसमध्ये आगीची घटना

 कसारा-खर्डी दरम्यान पंचवटी एक्सप्रेसमध्ये आगीची घटना,  आज सकाळी मुंबईकडे जाताना घटना, D 11 बोगीच्या चाकाजवळ आग भडकली, प्रवाशांच्या लक्षात येताच रेल्वे थांबवून आग विझवली गेली आणि रेल्वे पुढे मार्गस्थ झाली , मोठा अनर्थ टळला, कोणीही जखमी नाही, सर्व प्रवासी सुखरूप

चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरातील पेठवार्ड परिसरात असलेल्या लेंडारा तलावातील हजारो माशांचा मृत्यू

चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरातील पेठवार्ड परिसरात असलेल्या लेंडारा तलावातील हजारो माशांचा मृत्यू... तलावातील प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शंका, मेलेल्या मासोळ्यांच्या दुर्गंधी मुळे परिसरातील नागरिक हैराण तर दुसरीकडे स्थानिक मच्छीमारांच्या रोजीरोटीवर संकट

गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

अखेर अजित पवार दौऱ्याच्या वेळी शेकडोची गर्दी गोळा झाल्याने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे सत्ताधारी आता सर्वोच्च न्यायालयात

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे सत्ताधारी आता सर्वोच्च न्यायालयात,


राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून निवडणुकीला स्थगिती देण्याची याचिकेतून विनंती,


याआधी मुंबई उच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे दिले होते आदेश,


सत्ताधारी गटातील फुटीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा,

पार्श्वभूमी

राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा राज्यातील कोरोना परिस्थितीबाबतची महत्त्वाची माहिती जनतेला दिली आहे. ट्विट करत त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशाराच दिला आहे. दर दिवशी महाराष्ट्रात नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे काही अंशी वाढतानाच दिसत आहे. अर्थात काही दिवस याला अपवादही ठरत आहेत. दरम्यान, रविवारी एका दिवसात राज्यात तब्बल 30535 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, 11314 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. आतापर्यंत राज्यात एकूण 2214867 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात करण्यात यश मिळवलं आहे. 


 माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या दाव्याबाबत शंका; महत्वाची कागदपत्रे 'एबीपी माझा'च्या हाती


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये परमबीर सिंग यांनी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना आपल्या निवासस्थानी बोलवल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र, या संदर्भातील काही रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती लागले असून माजी पोलीस आयुक्त यांच्या पत्रातील दाव्याबाबत आता शंका उपस्थित होत आहे.


गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही : जयंत पाटील


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.