Breaking News LIVE : राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत

Breaking News LIVE Updates, 18 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jun 2021 08:00 PM
महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांसाठी होणार सुरु

महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांसाठी होणार सुरु,
शनिवारपासून संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटन सर्वांसाठी खुले,
नियम आणि अटी लागू करुन सुरु करण्याचा वाई प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय,
पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी,
तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी,
निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पाचगणीत दिली जाणार एन्ट्री
प्रांताधिकारी संगिता राजापुरे – चौगुले यांनी घेतली होती बैठक
महाबळेश्वरातील हिरडानाका येथे झालेल्या बैठकीत निर्णय

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची समिती गठित

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची समिती गठित,


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठीत,


 या समितीत उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश,


 परिवहन विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही समिती सूचना करणार,

अभिनेते सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा

अभिनेते सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. लग्नासाठी 15 दिवसांचा तात्पुरता जामीन. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील उद्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची उद्या भेट घेणार आहेत. सातारा, सांगली भागात 2019 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आतापासूनच कर्नाटक सरकारशी संवाद ठेवण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण या  मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. 

मनसुख हिरण हत्या प्रकरणातील मोठी अपडेट

मनसुख हिरण हत्या प्रकरणातील मोठी अपडेट, आणखी तीन पोलिस अधिकारी एनआयएच्या रडारवर 

तळकोकणात कोरोना पॉझिटिव्हिटी रेटसंदर्भात सकारात्मक बातमी, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 7.47 टक्के : पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दर 30.69 टक्के होता, तो आता 7.47 टक्के झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही सकारात्मक बातमी आहे. जिल्ह्यातील कोरोना टेस्ट वाढवल्या असून त्या पद्धतीने कोरोना रुग्ण कमी भेटत असले तरी दिवसाला 5 ते 6 हजार व्यक्तींच्या टेस्ट केल्या जात आहेत. सकारात्मकरित्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे. येत्या 8 ते 10 दिवसात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांच्या खाली येईल, अशी आशा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची काल झालेली बैठक ही समाधानकारक झाली. असून त्यामध्ये झालेले निर्णय आहेत ते 15 दिवसात किंवा तीन आठवड्यात लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.  त्यासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

मुंबईसह राज्यभरात साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य

मुंबईसह राज्यभरात साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य. मात्र केंद्र सरकारकडून मुबलक लसींचा साठा उपलब्ध व्हायला हवा, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती 

शिवसेनेचं खच्चीकरण किंवा अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिलं जात असेल तर तो चुकीचा समज : उदय सामंत

"भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही. शिवसेना ज्यांच्या नेतृत्वात काम करते असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व अख्ख्या जगाला दिसलेलं आहे. कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. देशातील सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेना मंत्रीपद दिल जात असेल तर हा चुकीचा समज आहे," अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांच्या जवळ

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी 23 फुटांच्या जवळ पोहोचली असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागण्याची शक्यता आहे.

कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करणार

साताऱ्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून पाणी सोडलं जाणार आहे. 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणी साठा आहे.
तर धरणात 25 हजारांपेक्षा जास्त क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेसह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड परिसरात मुसळधार पाऊस सुरुच आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर, 12 तासात पाणी पातळीत तीन फुटांनी वाढ

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. चंदगड- गडहिंग्लज राज्य महामार्गावर भडगावजवळ पाणी आलं आहे.


 

पुढील 3-4 तासांत नवी मुंबई, रायगडसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे

जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात कोण मारणार बाजी ?

जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांशी भिडणार असून, याच सामन्याकडे सर्व क्रीडारसिकांचं लक्ष असणार आहे. 

पार्श्वभूमी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा
आजपासून सुरू होणार्‍या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.


मराठा समाजाचं आंदोलन स्थगित नाही, 21 जूनला समन्वयकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ : संभाजीराजे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर मूक आंदोलनाची घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर आज मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र राज्यभरात होणारे आंदोलन अद्याप स्थगित केले नाही. अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास सव्वा दोन तास मराठा समाजाचं शिष्टमंडळ आणि सरकारच्या प्रतिनिधींनीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे बोलत होते.


राज्यात सध्या 1,39,960 अॅक्टिव्ह रुग्ण, गुरुवारी 9,830 नवे कोरोनाबाधित
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. गुरुवारी 9,830 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5,890  कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 236  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी एकूण 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.