Breaking News LIVE : आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष

Breaking News LIVE Updates, 14 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jul 2021 05:14 PM
राज्यात आज 8602 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6067 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Corona Update : राज्यात आज 8602 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6067 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव  अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल.


या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र  व आवश्यक सर्व  अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती व विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात येतील.  या समित्यांमध्ये जमीन हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल.साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबध्दरित्या आयोजित करण्यासाठीच्या सविस्तर आणि तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आलीय. राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्याची दखल,

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्याची दखल, कोरोनाकाळात धारावीत केलेल्या कार्याचा लंडनच्या संस्थेकडून गौरव, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कोरोनाकाळातील कार्याची दखल लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'नं घेतली, कोरोनाला हद्दपार करणारा धारावी पॅटर्न राबविण्यात विशेष योगदान दिल्याबद्दल 'सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट' या सन्मानपत्राने त्यांना गौरविण्यात आले. वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे डॉ. दीपक हरके यांनी मुंबईत खासदार शेवाळे यांना हे सन्मानपत्र बहाल केले

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना, राज्यांच्या मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश, सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारांमध्ये सुरु असलेल्या गर्दीवर कडक कारवाईचे निर्देश

गणेश उत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या 72 विशेष गाड्या

गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहे.

गणपती उत्सव 2021दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोकणात विशेष 72 गाड्या चालवणार

गणपती उत्सव 2021दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहे.


1. CSMT- सावंतवाडी रोड डेलीस्पेशल. या गाडीचेएकूण ३६ ट्रिप होणार 


२)  CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल. या गाडीचे 10 ट्रिप होणार.


३) पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल 
या गाडीचे १६ ट्रीप होणार 



४) पनवेलरत्नागिरी बाय विकली स्पेशल. या गाडीचेएकूण१० ट्रीप होणार.

काँग्रेस वेगळी झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील ; शिवसेना खासदार संजय राऊत

काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याविषयी निर्णय सोनिया, राहुल, प्रियंका गांधी घेतीस; काँग्रेस वेगळी झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील ; शिवसेना खासदार संजय राऊत लाईव्ह

प्रशांत किशोर यांच्याशी भेटीबाबत पवार आणि गांधींकडून अजून काही माहिती नाही; संजय राऊत 

पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्यामुळे मदत झाली आहे. तर प्रशांत किशोर यांच्याशी भेटीबाबत पवार आणि गांधींकडून अजून काही माहिती नाही; शिवसेना खासदार संजय राऊत 

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी झोटिंग समितीचा खडसेंवर ठपका?

भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीनं एकनाथ खडसेंवर गंभीर ठपका ठेवलाय. पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना जमीन भूखंड विकत घेता यावा म्हणून खडसेंनी पदाचा गैरवापर केला असा अहवाल झोटिंग समितीनं तात्कालीन सरकारला सादर केला होता अशी माहिती आता समोर येतेय. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलंय. झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं होतं. त्यानंतर मंत्रालयातल्या यंत्रणा कामाला लागल्या आणि झोटिंग समितीचा अहवाल पुन्हा प्राप्त झाल्याचं कळतंय. दरम्यान भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या खडसे, त्यांच्या पत्नी आणि जावयाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. अशातच झोटिंग समितीचा अहवाल समोर आल्यानं खडसेंच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे

प्रशांत किशोर यांनी सोनिया-राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट

प्रशांत किशोर यांनी सोनिया-राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट, 2024 च्या निवडणुकांबाबत खलबतं झाल्याची माहिती, विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा 

करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासला सुरवात

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपये चोरीला गेल्यानंतर पोलीस पथकाने नोट प्रेसमध्ये पहाणी केली ाहे. या प्रकरणी नोट प्रेसमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही चोरी झाली कशी असा प्रश्न विचारला जातोय. प्रेसमध्ये बाहेरील व्यक्तीस प्रवेश नाही, त्यामुळे प्रेसमधील अज्ञात कामगार, स्टाफ किंवा सुरक्षा रक्षकांपैकी कोणीतरी पैसे चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बळकावली जमीन, उंडणगावच्या महिलेचा आरोप

औरंगाबाद सिलोडचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझी उंडणगाव  येथील गट क्रमांक 333 मधील जमीन बळकावली असल्याचा आरोप आशाबाई धोंडू बोराडे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ती जमीन परत द्यावी, अन्यथा त्याचा मोबदला देण्याची मागणी केली आहे. त्या जमिनीवर त्यांच्या परिवाराची संस्था आदर्श एज्युकेशन सोसायटी अंभई मार्फत येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कला व विज्ञान महाविद्यालयाचे बांधकाम गेले गेले आहे . 


 

भिवंडीत इमारतीच्या स्लॅबचा प्लॅस्टर कोसळला, तीन मुलं जखमी
भिवंडी : शहरातील फंडोले नगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा प्लॅस्टर कोसळल्याने तीन मुलं जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली असून त्यांना उपचाराकरता जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 मिळालेल्या माहितीनुसार, शांती नगर पोलिस स्टेशन अंतर्गत फंडोले नगर परिसरात असलेल्या या इमारतीला फक्त सात वर्षांपूर्वी बनवण्यात आली होती. या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जेवण करून  एक कुटुंब घरात झोपलं असतांना रात्री अचानक इमारतीच्या हातावरील स्लॅबचा प्लास्टर खाली झोपलेल्या मुलांचा अंगावर पडलं आणि या दुर्घटनेत तीन मुलं जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली आणि यात जखमी मुलांना उपचाराकरता जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मुलांच्या डोक्याला तसेच हातापायाला जबर मार बसला असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर दुसरीकडे भिवंडीत फक्त सात वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या इमारतीचा जर स्लॅबचा भाग कोसळत असेल तर इमारतीत किती निष्कृष्ट दर्जाचे काम झाला असेल याचा अंदाज यावरून दिसून येतोय त्यामुळे एकदा पुन्हा भिवंडीत धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची नाराजी

नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. काल शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वरती बैठक झाली. त्यामध्ये तुम्ही वेगळेच लढणार असेल तर आधीच सांगा, आम्हीही तयारीला लागतो असं शरद पवारांनी सांगितलं. जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसही सांगा असंही शरद पवारांनी सांगितल्याचं समजतंय. 

बुलढाण्यात पावसाची जोरदार हजेरी, शेगाव, नांदुरा, खामगाव परिसरात मुसळधार पाऊस

बुलढाणा : जिल्ह्यात सकाळपासून सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेगाव, नांदुरा, खामगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळे मात्र शेतकरी सुखावला असून शेतीची सर्वच कामे झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडी उसंत मिळाली आहे.

परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस 

परभणी : परभणीत दोन दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसतोय. काल रात्रीपासून जिल्हाभरात संततधार पाऊस सुरुय.पहाटेपासुन पावसाचा जोर वाढला असून पुन्हा एकदा नदी, नाल्यांना पाणी आले आहे, तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झालीय. दरम्यान आज असाच पाऊस बरसत राहिला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ग्रामपंचायतीचा आता प्रकल्पाला पाठिंबा

रत्नागिरी : राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरीला आता दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी विरोधात असणाऱ्या राजापूर तालुक्यातील विलेय ग्रामपंचायतीनं आता रिफायनरीच्या पाठिंब्याचा ठराव संमत केला आहे. मासिक सभेत हा ठराव संमत करण्यात आला आहे. त्यानंतर राजापुरच्या तहसिलदारांकडे हा ठराव सुपूर्द देखील करण्यात आला आहे. इतकंच नाही तर ग्रामपंचायतीच्या वतीनं एक पत्र देखील शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ स्थानिक नेते, पदाधिकारी समर्थन करत होते. पण, आता थेट ग्रामपंचायतीकडून रिफायनरीच्या समर्थनार्थ ठराव करण्यात आला आहे. शिवाय विलये दशक्रोशी समर्थन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता रिफायनरी आणि त्यासंदर्भातील वाढता पाठिंबा याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत. 

वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला सुरुवात, बळीराजा सुखावला

वाशिम : वाशिम जिल्ह्यात रात्री पासून पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाला सर्वदूर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर सतंत धार पडणाऱ्या पावसाने थोडी का होईना जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. 

पार्श्वभूमी

इंग्लंडप्रमाणे भारतातही लोकांना मास्कशिवाय फिरताना पाहायचंय - हायकोर्ट


मुंबई : रविवारी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीचा आनंद तिथले क्रिडा रसिक जसे प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सेंटर कोर्टवर विनामास्क घेत होते, तसा आनंद आपल्या भारतातही लोकांना मास्कशिवाय फिरताना घेतलेला पाहायचाय, अशी आशा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे.


राज्यातील कोविड-19च्या सद्यस्थितीबाबत आणि येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या सज्जतेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, विम्बल्डनची अंतिम लढत पाहताना सेंटर कोर्टवर उपस्थित एकाही प्रेक्षकाने मास्क घातले नव्हते, कोर्ट प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते. एका भारतीय क्रिकेटपटूनं तसेच बॉलिवूडच्या अभिनेत्रीनंही त्या सामन्याला हजेरी लावली होती. मात्र, त्यांनीही मास्क घातलेलं नव्हते ही बाब न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि भारतात अशी वेळ कधी येणार? भारतीय पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू लागणार? अशी विचारणाही केली. त्यावर सगळ्यांचे लसीकरण ही त्यामागची एकमेव गुरुकिल्ली असल्याचं हायकोर्टानं नमूद केलं.  


एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न; झोटींग अहवाल गायब प्रकरणी प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया


मुंबई : "राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीची चौकशी सुरु आहे. त्यांना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. मला वाटतंय, झोटींग समितीचा अहवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी गायब केला आहे. एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे.", आशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी झोटींग समितीचा अहवाल गायब होण्याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, "आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे."


दरमान्य प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील उत्तरं दिली. नाना पटोले यांच्या विधानाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, "नाना पटोले यांनी अनेकवेळा अशाप्रकारे आपली तलवार म्यांन केली आहे. आता नानांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे. नाना पटोले यांच्या भावना खऱ्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना खऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी भावना ताकदीने मांडल्या. परंतु त्यानंतर अजित दादांची नाराजी, मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार त्यामुळे ते शांत झाले आहेत. त्यामुळं त्यांनी तलवार म्यान केली आहे. भावना तर त्यांनी प्रकट केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे दिसत आहे. जे एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय विश्वास देणार?"


Mumbai Airport Update: मुंबई विमानतळाची कमांड आता अदानी समूहाकडे; गौतम अदानी म्हणाले...


Adani Mumbai International Airport : अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मंगळवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा केली. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती.


या करारानंतर अदानी ग्रुपचा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात 74 टक्के हिस्सा असेल. त्यापैकी 50.5 टक्के भागभांडवल जीव्हीके समूहाकडून आणि उर्वरित 23.5 टक्के भागभांडवल भागीदार विमानतळ कंपनी दक्षिण आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूहाकडून अधिग्रहित केला जाईल.


एमआयएएल बोर्डाच्या बैठकीनंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (एएएचएल) जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली. गौतम अदानी म्हणाले, की "जागतिक दर्जाचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापित करण्यास आम्हाला आनंद होत आहे. मुंबईला आमच्यावर अभिमान असेल. भविष्यातील व्यवसायासाठी अदानी समूह विमानतळात आणखी सुधारणा करेल. "

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.