Breaking News LIVE : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत वीस वारकरी पॉझिटिव्ह

Breaking News LIVE Updates, 01 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2021 11:41 PM
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत वीस वारकरी पॉझिटिव्ह

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत वीस वारकरी पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिलाय. उद्या या सर्वांच्या संपर्कातील वारकऱ्यांचा आधी शोध घेतला जाईल आणि मगच प्रस्थान सोहळा पार पडणार आहे.  प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित वारकऱ्यांची चाचणी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत 164 वारकऱ्यांपैकी 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकारकडून दाखल पुनर्विचार याचिकेची उद्या सुनावणी

ओबीसी आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकारकडून दाखल पुनर्विचार याचिकेची उद्या सुनावणी,


निकालानंतर ज्या पाच जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे ती पुढे ढकलली जाणार की नाही याचा फैसला उद्या,


कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेचं कारण देत राज्य सरकारने या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी याचिकेत केली आहे.

मराठा आरक्षण : केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली


मराठा आरक्षण केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली,


102 व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने दाखल केलेली पुनर्विचार याचिका,


एसईबीसी चे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही या मतावर खंडपीठ ठाम,


पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळली केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका,

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 24 सदस्यीय सुकाणू समिती

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 24 सदस्यीय सुकाणू समिती गठित, या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री , 


या आर्थिक वर्षात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या  सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम केल जाणार,


दर तीन महिन्यातून एकदा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची बैठक होणार

कल्याण डोंबिवलीत लससाठा उपलब्ध सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद

कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद, शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या 2 जुलै रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 25 लसीकरण केंद्र बंद राहणार

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा रोल होता, देशमुखांचे स्वीय सहाय्यक पलांडेंची कबुली, सूत्रांची माहिती

Breaking News LIVE : अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा रोल होता, देशमुखांचे स्वीय सहाय्यक पलांडेंची कबुली, सूत्रांची माहिती


 
अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पोलीस अधीक्षकाविरुद्ध विशेषाधिकार भंगाची तक्रार

अमरावती विधानसभा कार्यक्षेत्रातील कार्यक्रमांना स्थानिक आमदाराला जाणीवपूर्वक डावलल्याचे प्रकरण. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी पोलीस अधीक्षकांविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याच्या वक्तव्यानंतर आता अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचीही पोलीस अधीक्षक यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार.अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकाविरुद्ध विशेषाधिकार भंगाची तक्रार...
 

रायगड : मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, अपघातात वाहनांतील काही प्रवासी जखमी

रायगड : मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, अपघातात वाहनांतील काही प्रवासी जखमी. कार , कंटेनर ट्रेलर आणि इतर वाहनांचा अपघात, एक पुरुष, महिला आणि लहान मुलाचा मृत्यू. खोपोलीनजीकच्या बोरघाटात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा अपघात

विदर्भातील अनेक जिल्हयात पावसाचा अंदाज

विदर्भातील अनेक जिल्हयात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

रायगड जिल्ह्यातील 'बल्क- ड्रग' प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

रायगड जिल्ह्यातील 'बल्क- ड्रग' प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम, शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांची भेट घेणार, भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांची माहिती

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांचा हल्ला

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांचा हल्ला, दोन अज्ञात तरुणांनी हातात दगड घेऊन कार्यालयाची काच फोडण्याचा केला प्रयत्न, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

वर्धा : वाघिणीच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, वर्धा जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातील राहटी शिवारातील घटना

वर्धा : वाघिणीच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, वर्धा जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातील राहटी शिवारातील घटना, श्रीराम बिट स्वतःचे जनावरे घेऊन जात असताना अचानक वाघाने हल्ला केला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल. सोलापुरात संचारबंदी लागू असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकणी गुन्हा. भांदवि कलम 188, 336, 269 आपत्ती व्यवस्थापन कायदाच्या कलमानुसार गुन्हा दाखल. मी कोणताही गुन्हा केलेला नाहीय, केवळ वीस लोक या ठिकाणी उपस्थित आहे. संचारबंदी लागू असल्याने आम्ही संध्याकाळी घोंगडी बैठक घेतली नाही. अजित पवार, जयंत पाटील यांच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी होते, त्यांच्यावर गुन्हे होत नाहीत. पोलीस हे शरद पवारांच्या दबावाखाली आहेत.

 किरकोळ वादातून पुण्यातील नवविवाहित डॉक्टर पती-पत्नीची आत्महत्या

नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादानंतर एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याचा वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला. एकीकडे डॉक्टर दिवस असल्यामुळे डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असतानाच अशाप्रकारे दुःखद घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डोंबिवली मिलाप नगर परिसरात मनसेचे प्रतिकात्मक आंदोलन; मनसैनिकांनी स्वखर्चानं रस्त्यातील खड्डे बुजवले

डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर परिसरात रस्त्याची चाळण झालीये .या रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी निधीची घोषणा झाली मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने ऐन पावसाळयात नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमन करावे लागते .याबाबत मनसे आज मिलाप नगर परिसरात प्रतिकात्मक आंदोलन केलं आज मनसेने स्वखर्चने खड्डे बुजविण्याचे अनोखे आंदोलन केले.एमआयडीसी विभागाला 110 कोटी चा निधी मंजूर झाला आहे मात्र पावसाळ्यानंतर येथील कामाला गती येणार आहे.सगळ्यात महत्वाचे मे महिन्यात हे खड्डे का बुजविले जात नाही अस सवाल करत .खासदार श्रीकांत शिंदे हे फक्त तारखा देतात मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असा आरोप जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केला आहे. 

धुळे: जिल्ह्यात लसीकरणासाठी 45 वर्षावरील नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद, तर तरुणांचा भरघोस प्रतिसाद

धुळे : धुळे जिल्ह्यासाठी तीस हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून कोव्हॅक्सिनचा डोस फक्त धुळे तालुक्यातच उपलब्ध झाला आहे, मात्र एकीकडे लसींचा साठा उपलब्ध झालेला असताना दुसरीकडे मात्र लसीकरणासाठी 45 वर्षीय नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे राज्यात डेल्टा प्लस चा वाढता धोका लक्षात घेता 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण वेगाने होणे अत्यंत गरजेचे असताना मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद ही चिंतेची बाब ठरत आहे, शहरातील जिल्हा रुग्णालयात 45 वर्षावरील नागरिकांसाठी सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत 45 वर्षावरील नागरिकांचे 40 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून प्रशासनाने जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. 

गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे : संजय राऊत

संजय राऊत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "एकतर्फी हल्ले होत आहेत. खोटे हल्ले होत असून चुकीचे आरोप केले जात आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जातो. म्हणजेच, अनेक खोट्या आणि बनावट गोष्टी खऱ्या म्हणून समोर आणल्या जातात. गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात असे आरोप होत असतात, पण आरोप करताना काही मर्यादाही आपल्याला पाळाव्या लागतात. आणि त्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज आहे."

चंद्रकांत पाटील निष्पाप, निरागस आहेत : संजय राऊत

चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांना अजित पवारांच्या सीबीआय चौकशीसाठी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचं डिक्टेशन चांगलं आहे पाहिलं मी. त्यांनी फआर चांगल्या प्रकारे पत्र ड्राफ्ट करतात. पण त्यात काही चुका आहेत. पत्रकार असल्यामुळे मला त्या चुका दिसतात. काय चुका आहेत, ते वेळ आल्यावर सांगू आम्ही. चंद्रकांत पाटील अत्यंत विद्वान आहेत. त्यांच्यासारखा विद्वान राजकारणी महाराष्ट्रात मी गेल्या काही दिवसांत पाहिलेला नाही. मी मागेही म्हटलं होतं की, ते निष्पाप आहेत, निरागस आहेत. लहान बालकासारखे आहेत ते. त्यामुळे त्यांच्या या गोष्टी सहजतेने घेतल्या पाहिजेत. विरोधी पक्षांनी आपलं काम करत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू." 

सातारा जिल्ह्यात 971 रुग्ण तर 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 971 रुग्ण सापडले तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचार देऊन 803 रुग्णांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आज अखेर 1.94,338 बाधित सापडले आहेत तर 180,707 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आला आहे. सध्या 9,245 रुग्णांवर उपचार सुरु आहे. 

गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मारेकरी अब्दुल रौफची जन्मठेपेची शिक्षा योग्य : हायकोर्ट

गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मारेकरी अब्दुल रौफची याचिका फेटाळली. मुंबई सत्र न्यायालयाने अब्दुल रौफला दिलेली जन्मठेपेची शिक्षा योग्यच असल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलं.


 
पुणे-बंगळुरु महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवर दरवाढ

पुणे-बंगलोर महामार्गावरील किणी आणि तासवडे या दोन प्रमुख टोल नाक्यांवर टोलची दरवाढ करण्यात आली आहे. 5 ते 25 रुपयांपर्यंत ही दरवाढ करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी रात्रीपासून सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही टोलनाक्यावर आता लहान वाहनांसाठी 80 रुपये तर मोठ्या अवजड वाहनांसाठी 290 रुपये टोल वसुली केली जात आहे. टोल नाक्यांवर फास्ट टॅग यंत्रणा असल्याने दरवाढीवरुन वाहनधारकांनी कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत नसली तरी दरवाढीचा भुर्दंड मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलची दिवसेंदिवस दरवाढ होत असताना आता टोलच्या दरातही वाढ झाल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कुठलाही कायदा करणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

आज आपण कृषी दिन साजरा करतोय पण केंद्राने सात महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कुठलाही कायदा करणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना फायद्याचे, मदतीचे बिल पास झाले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, त्यामुळे राज्यातील नवीन कृषी कायद्याचा बारकाईने अभ्यास करत आहोत असंही त्यांनी सांगितलं. 

संभाजीराजे छत्रपती सहकुटुंब संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणार 

जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आज दुपारी दोन वाजता सुरु होणार आहे. यावेळी श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती , श्रीमंत सौ. युवराज्ञी संयोगिताराजे आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे उपस्थित राहणार आहेत. प्रस्थान झाल्यानंतर परंपरेप्रमाणे पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी कीर्तन मंडपात ठेवून सायंकाळी सहा वाजता समाज आरती, कीर्तन, जागर होईल.

कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा; बुलढाणा शहरातील अपंग निवासी विद्यालय कोविड सेंटरमधील प्रकार

बुलढाणा : कोरोनाग्रस्त असलेल्या आरोपीला उपचारासाठी सोबत घेऊन आलेल्या मद्यधुंद पोलिसाने कोविड सेन्टरमधेच धिंगाणा घातल्याचा प्रकार बुलढाण्यात घडला आहे. बुलढाण्यातील अपंग निवासी विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाच हे नाट्य रंगलं आहे. दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी या पोलिसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता फुल्ल टू ऑन झालेल्या या पोलिसाने उलट त्यांनाच दमदाटी केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे या पोलिसासोबत आरोपी देखील होता त्यामुळे कायद्याचे तीनतेरा वाजवणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला 100 ऐवजी जादा 250 भाविकांना परवानगी, तर माऊली पालखी सोहळ्यातील 350 वारकऱ्यांना परवानगी

पंढरपूर : आज होणाऱ्या तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पूर्वी परवानगी दिलेल्या 100 भाविकांसह जादा 250 भाविकांना परवानगी मिळाली आहे. आळंदी येथून उद्या प्रस्थान होणाऱ्या माऊली पालखी सोहळ्याला पूर्वीच्या 100 वारकऱ्यांसह जादा 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. 

रत्नागिरीत जून महिन्यात 16 हजार 692 जणांना कोरोनाची लागण तर पाचशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यामध्ये 16 हजार 692 जणांना कोरोनाची लागण झाली असून महिनाभरात पाचशेपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 14.41 टक्के असून मृत्यू दर 2.86 टक्के आहे. सध्या जिल्ह्यात 6241 केस अॅक्टिव्ह आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 62,100 जणांना कोरोनाची लागण झाली असून 54,081 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1778 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 87.24 टक्के असून 3 लाख 75 हजार 970 स्वॅब आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. 

पंढरपूरात बुधवारी 117 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, कोरोना बळींचा एकूण आकडा पाचशे पार

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी 371 कोरोना रुग्ण आढळून आले असून यापैकी 117 एकट्या पंढरपूर तालुक्यातील आहेत. शहरात 10 तर ग्रामीण भागात 107 रुग्ण नोंदले गेले आहेत.सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पंढरपूर तालुक्यात सापडले असून आजवर 25 हजार 744 जणांची नोंद आहे तर 503 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 374 जणांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली असून राजेश पांडे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती. राजेश पांडेला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरुन अटक करण्यात आली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा, आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10, 353 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,19,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.02% टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1400 रुग्ण तर नंदूरबारात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता लवकरच मिळणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातव वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता राज्य सरकारकडून लवकरच दिला जाणार आहे. निवृत्तीवेतनच्या थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतन सोबत रोखीने दिली जाणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी सातवा वेतन आयोग थकबाकीच्या दुसरा हफ्ता ऑगस्ट महिन्याच्या पगाराबरोबर दिला जाणार आहे. तर जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा तसेच इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची थकबाकी रक्कम सप्टेंबर महिन्यातील पगारात दिली जाणार आहे. 


Corona Vaccination : मुंबईत उद्या लसीकरण बंद राहणार; पुरेशा लस साठा उपलब्ध नसल्याने प्रशासनाचा निर्णय
मुंबईकरानो, उद्या सकाळी लवकर उठून पटापट आवरुन लस घेण्यासाठी जाणार असाल तर, जरा थांबा. उगाच निराशा करुन घेऊ नका. कारण उद्या मुंबईत लसीकरण बंद असणार आहे. पुरेशा लस साठ्याअभावी उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे. 


कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती दिली जाईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.


सार्क देशांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे सडक्या सुपारीची आयात, केंद्र सरकारला कोट्यवधींचा चुना
 सार्क देशांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे इंडोनेशियामधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या सडक्या व धोकादायक सुपारीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबादमधील 17 ठिकाणी चौकशी केली आहे. या प्रकरणात नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि अहमदाबाद मधील काही व्यापाऱ्यांनी कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्र सरकारला शेकडो कोटींचा कस्टम ड्युटीचा चुना लावल्याचे समोर आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.