Breaking News LIVE: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई

Breaking News LIVE Updates, 18 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Apr 2021 07:42 AM
उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन
उल्हासनगर शहरात राजकीय दबदबा असणाऱ्या ज्योती कलानी यांचं आज सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सायंकाळच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.मृत्यू समयी त्या 65 वर्षाच्या होत्या.ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर स्थायी समिती सभापती ,महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली .गत विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता .राजकारणात त्या "भाभी" या नावाने परिचित होत्या .उल्हासनगर मधील राजकारण त्यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हते .कुख्यात टाडा फेम माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या.

 

 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई

 शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितिचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी बेळगावात रॅली काढून संयुक्त महाराष्ट्र चौकात जाहीर सभा घेतली होती.या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता.पोलिसांनी अनेक कारणे दाखवून सभेला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला पण सभेला आवश्यक परवानगी घेतल्याची कागदपत्रे दाखवल्यावर पोलिसांना गप्प बसावे लागले.सभेत मास्क घातले नव्हते,सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याचा ठपका सभेच्या आयोजकांवर ठेवून प्रशासनाने एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाची त्याच ट्रकखाली आत्महत्या

पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाने त्याच ट्रकखाली आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरू आहेत, या संशयावरून अख्खं कुटुंब संपविण्याचा प्रयत्न बापाने केला. सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी यातून बचावल्या आहेत. भरत भराटे असं निर्दयी मृत बापाचे नाव आहे तर 18 वर्षीय नंदीनी आणि 14 वर्षीय वैष्णवी या दोन्ही मुलींची त्याने हत्या केली. या घटनेपूर्वी बापाने एक चिठ्ठीही लिहून ठेवलेली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्खं कुटुंब संपवित असल्याचं नमूद आहे.

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला- गृहमंत्री दिलीप वळसे

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया, येत्या दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो.  रेमडेसिवीरसंदर्भात पोलिसांजवळ इनपुट्स होते, वळसे पाटलांची माहिती.  

बार्शीतील सराफ व्यापाऱ्याचे पोलिस निरीक्षकाविरोधात धक्कादायक आरोप

बार्शीतील एका सराफ व्यापाऱ्याने एका पोलिस निरीक्षका विरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. बार्शीतील पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप सराफ व्यापारी अमृतलाल गुगळे यांनी केला आहे. अमृतलाल गुगळे यांचा आरोप करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. दुकानात मार्च एंडिंग ची कामे सुरू असताना काही पोलीस दुकानात आले त्यांनी मला पोलिस चौकीत नेले. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पाच लाख रुपये द्या. गृहमंत्र्यांपर्यंत आम्हाला हफ्ते द्यावे लागतात, पैसे द्या अन्यथा आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिल्याचा आरोप देखील सराफ व्यापारी गुगळे यांनी केला आहे. पैसे देण्यास मनाई केल्यानंतर दुकान सील करण्यात आल्याचा आरोप ही या सराफ व्यापाऱ्याने या व्हिडिओत केला आहे.
दरम्यान या संदर्भात आम्ही पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांच्याशी फोनवरून संपर्क केला. लॉकडाउन असताना देखील गुगळे यांचे दुकान सुरू असल्याचे सोशल मीडियावर वायरल होत होते. त्यानुसार पोलिसांनी जाऊन तपासणी केली. तेव्हा दुकान आतून सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे गुगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी खोटे आरोप केले आहेत. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली आहे. 

ये महाराष्ट्र की पब्लिक हें. ये सब जानती है..., आमदार गोपीचंद पडळकर यांची राज्यसरकरवर खरमरीत टीका

नवाब मलिक गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तेथील १५ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना धीर न देता आपले पाप झाकण्यासाठी आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरून घालण्यासाठी नवाब मलिक भाजपवर बेछूट आरोप करत आहेत. ये महाराष्ट्र की पब्लिक हें. ये सब जानती है.... म्हणत राज्यसरकारवर खरमरीत टीका. राज्य सरकारकडे ऍक्शन प्लॅन नाही, महाराष्ट्र सरकारने बेशरम पणाचा कळस गाठला आहे. 


 

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ घालत सहायक सचिव विनोद कराळे यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदारांना अटक

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ घालत सहायक सचिव विनोद कराळे यांना मारहाण करणारे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक. अकोट शहर पोलिसांनी केली अटक. काल रात्री विविध कलमांतर्गत झाले होते गुन्हे दाखल. माजी आमदार गावंडे यांच्या बाजार समितीत वारंवारच्या गोंधळाने आहेत कर्मचारी हैराण.

लातूर : शहरात विनाकारण फिरणाऱ्या 36 लोकांना दंड आणि करोना चाचणी 

लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. याची गंभीर दखल घेत मनपाने आज पासून मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरताना कोणी आढळला तर फक्त आर्थिक दंड करायचा नाहीतर त्या व्यक्तीची अँटीजन टेस्ट ही करायची पॉझिटिव्ह आला तर रवानगी कोविड केअर सेंटरला करण्यात येणार आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली अनेक जण विनाकारण फिरत असतात. यांच्यावर चाप बसावा यासाठी मनपा प्रशासनने शिवाजी नगर पोलिसाच्या मदतीने 36 लोकांना आर्थिक दंड केला आहे. तसेच यांची अँटीजन टेस्ट ही करण्यात आली आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये. स्वतः सोबतच कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

Coronavirus : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; गेल्या 24 तासांत 1 हजार 501 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे 1 हजार 501 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1,38,423 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 234,692 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत 15 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यात 14 दिवसांसाठी कडक नियमावली

मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवा फक्त 4 तास सुरू राहणार. सर्व सामान्यांसाठी पेट्रोल व डिझेल फक्त 4 तास उपलब्ध. आज मध्यरात्रीपासून होणार अंमलबजावणी
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश. सकाळी 7 ते 11 या काळातच सुरू राहणार मेडिकल वगळता सर्व आस्थापना. मागील दहा दिवसांत 23 हजार नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद. 

नाशिकमध्ये पूर्ण लॉक डाऊन करण्याची महापौरांची मागणी

महापौर सतीश कुलकर्णी यांनी लिहिले पालकमंत्री भुजबळ यांना पत्र शहरातील परिस्थिती हाताबाहेर जात  असल्यानं लॉक डाऊन करा, असं लिहित लॉकडाऊनने आर्थिक व्यवहार थांबणार असला तरी  नाशिककर मात्र जगेल. रुग्णांच्या तुलनेत स्टाफ, बेड कमी पडत आहे, आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे ही परिस्थिती उघड

गोरेगावच्या आरे कॉलनीत मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकरांची गर्दी

राज्यात संचारबंदीचा आज चौथा दिवस आहे. मात्र गोरेगावच्या आरे कॉलनीतील 20 नंबर पिकनिक पॉईंट परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. खरंतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली, मात्र नेहमीप्रमाणे आजही मुंबईकर मॉर्निंग वॉक करण्यासाठी आरे कॉलनीच्या रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले. तर या मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुंबईकरांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवलेले पाहायला मिळाले. मॉर्निंग वॉकसाठी आलेले लोक बिना मास्क घालून फिरताना दिसून आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार

औरंगाबादमध्ये आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंतच सुरु राहणार. यात किराणा, डेअरी , बेकरी ,खाद्यपदार्थ दुकाने ,भाजीपाला यांचा समावेशा आहे. फक्त मेडिकलची दुकाने 24 तास सुरु ठेवता येणार आहे.

पार्श्वभूमी

रेमडेसिवीर इंजेक्शनवरून हाय व्होल्टेज ड्रामा; मध्यरात्री देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यात


मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु होती. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारनेही नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं. पण ही लढाई रात्री थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली. Bruck Pharma कंपनीच्या संचालकांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीसांनी त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पार्ले पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.  


शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलीस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते. पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकांना सोडून दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे. भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता? यावरून मंत्र्यांच्या ओएसडीकडून Bruck Pharma कंपनीच्या लोकांना धमकावल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना बाधित रुग्णांचे स्थलांतर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रशासनाचा निर्णय


कोरोना बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील 168 रुग्णांचे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालयांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  


दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. हे समन्वय अधिकारी 24x7 या स्वरूपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्या बाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही ऑक्सिजन पुरवठ्या संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.


दिलासादायक बातमी! रेमडेसिवीरच्या किंमती घटल्या 


नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाने शनिवारी सांगितलं की सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीत घट केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वाची भूमिका बजावते. सरकारने रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये कॅडिला हेल्थकेयर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि सिप्ला या आघाडीच्या कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (100 मिग्रॅ) किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलाय.


कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता कॅडिला कंपनीच्या रेमडेसिवीरच्या किंमती आता 2800 रुपयांवरुन 899 रुपये इतकी होणार आहे. तसेच सिंजीन इंटरनॅशनलच्या रेमविन नावाने तयार होत असलेल्या रेमडेसिवीरची किंमत आता 3950 वरुन आता 2450 रुपये झाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी च्या रेमडेसिवीरची किंमत आता 5400 वरुन आता 2700 रुपये इतकी होणार आहे तर सिप्लाच्या रेमडेसिवीरची किंमत 4000 वरुन 3000 रुपये इतकी होणार आहे. माइलान कंपनीने आपल्या रेमडेसिवीरची किंमत कमी करुन ती 3400 रुपये इतकी केली आहे. या आधी ती 4800 रुपये होती. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.