Breaking News LIVE : मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

Breaking News LIVE Updates, 25th June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jun 2021 09:42 PM
मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

 मुंबई-लातूर, मुंबई-बिदर एक्स्प्रेस सुरु, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्सप्रेस 2 जुलैपासून द्विसाप्ताहिक धावणार

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिस

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजपला पोलिसांनी नोटीस धाडली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालय. याचा निषेध म्हणून हे उद्या उर्से टोल नाक्यावर रास्ता रोको केला जाणार आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. पण दुसरीकडे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी परवानगी घेतल्याचा दावा केलाय. परंतु आंदोलनाची वेळ गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे उद्या उर्से टोल नाक्यावर तणावपूर्ण वातावरण होण्याची शक्यता आहे.

नाशिक महानगरपालिकेची बनावट वेबसाईट, नागरिकाला 30 हजारांचा गंडा

नाशिकमध्ये एका नागरिकाने ड्रेनेज चेंबर संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती. त्याने ज्या वेबसाईटवर तक्रार केली ती मनपाची वेबसाईट बनावट असल्याचं समोर आलं आहे. सुरवातीला 20 रुपयांची तक्रार शुल्क आकारणी करण्यात आली, त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून दोन टप्प्यात 29 हजार  778 रुपये काढण्यात आले. 

तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरु, नागरिकांना खबरदारी घ्यावी: दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना बाबत बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सध्या आहेत तेच निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील शाळा महाविद्यालय 15 जुलै पर्यत बंद राहतील. तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे, त्याची तयारी सुरू आहे. नागरिकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांनी अनावश्यक बाहेर पडू नये. लहान मुलं तिसऱ्या लाटेत असणार आहेत, त्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेल्टा प्लस विषाणू अधिक घातक आहे, म्युकोरमायकोसिस आणि डेल्टा प्लस बाबत नागरिकांनी काळजी घेणं गरजेच आहे असंही ते म्हणाले. 

हा अनुभव सर्वांनाच येतोय, अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

सर्व एजन्सीचा वापर करायचा आणि त्रास द्यायचा हे असं होतच असत असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. आता अनिल देशमुखांकडे काही सापडत नाही, सीबीआयच्या चौकशीत काही सापडत नाही. त्यांचे आर्थिक व्यवहार तपासायचे, दहा वर्षांपूर्वीच काही काढायचं, अन एफआयआर दाखल करायचे अन छापे मारायचे काम सुरू आहे हा अनुभव सर्वांना येतोय असंही ते म्हणाले. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरात ईडीचे छापे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरात ईडीची झाडाझडती सुरु आहे. 

#BreakingNews राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीची छापेमारी

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीची छापेमारी. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आले असून आज सकाळी ईडीनं ही छापेमारी केली. 



 



 

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेची वाहतूक करणाऱ्यांना महिलांनी दिला चोप 

उघड्यावरून राख वाहून नेताना रस्त्यावर सांडणाऱ्या राखेचा त्रास इतका वाढत चालला होता की रस्त्यावर राखेचे ढग जमा होऊ लागले होते. अनेक वेळा अर्ज-विनंत्या करूनसुद्धा हे राख वाहून नेणारे कंटेनर चालक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. अखेर आज गोपीनाथ गड परिसरातील रणरागिनी रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी रस्त्यावरून जाणारे कंटेनर रस्त्याच्या कडेला लावले. यावेळी कंटेनर चालकांना त्यांचे शर्ट काढून रस्त्यावरची राख पुसून काढयला लावली. एवढेच नाही तर यावेळी नागरिकांनी कंटेनरची हवा सोडून दिली आणि महिलांनी कंटेनर चालकाना चोप दिला.

मुंबई - दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

मुंबई - दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला असून इमारतीतील 34 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. आशापुरा असं या इमारतीचं नाव आहे. सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड भोस्ते घाटात मुसळधार पावसामुळे महामार्गावर दरड कोसळली

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील खेड भोस्ते घाटात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर दरड कोसळली आहे. कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. रुंदीकरणात कापलेल्या डोंगराच्या मातीबरोबर दरड खाली सरकली. महामार्ग एक बाजूने बंद करण्यात आला आहे. 

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. आशापुरा असं या इमारतीचं नाव आहे. सकाळी साडेसात ते पाऊणेआठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. एकूण 34 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

एसीबीकडून आता सचिन वाझेविरोधात तपास सुरु

सचिन वाझेविरोधात आता महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोने तपास सुरु केला आहे. वाझेला दुसऱ्या मार्गाने कथितरित्या मिळालेल्या पैशांच्या माध्यमांचा तपास एसीबी करणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एसीबीने मुंबई पोलिसांकडून परवानगी मागितली आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याविरोधातील अधिक तपास करण्यासाठी यंत्रणेला संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागते. यामुळे गृहविभाग आणि मुंबई पोलिसांकडून परवानगी मागण्यात आली आहे. यावर मुंबई पोलिसांनी एसीबीला सांगितलं आहे की, "सचिन वाझेला पोलीस विभागातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे तपासासाठी आमच्या परवानगीची गरज नाही." सूत्रांच्या माहितीनुसार आता एसीबीने सचिन वाझेविरोधातील तपास अधिक वेगाने सुरु केला आहे. वाझेवर झालेल्या लाचखोरीच्या आरोपांनंतर एप्रिल महिन्यातच एसीबीने तपासासाठी गृहविभागाकडे तपासाची परवानगी मागितली होती. टीआरपी प्रकरणात त्यावेळी 30 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात आधीच ईडीकडूनी तपास सुरु आहे.

ABP Majha Impact : घोणे दाम्पत्याच्या चिमुकल्यांना मदतीचा हात, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्विकारलं चिमुकल्या मुलींचं पालकत्व

 माझा इम्पॅक्ट : घोणे दाम्पत्याच्या चिमुकल्यांना मदतीचा हात मिळाला आहे. कोरोनानं या चिमुकल्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हिरावून घेतलं. आजी-आजोबा या मुलींचा सांभाळ करत होते. त्यांची व्यथा एबीपी माझानं सर्वांसमोर मांडली होती. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अवघ्या 10 मिनिटांत या चिमुकल्यांना मदतीचा हात मिळाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या चिमुकल्या मुलींचं पालकत्व स्विकारलं आहे. 



 



 



 

पार्श्वभूमी

राज्यात गुरुवारी 9,371 रुग्ण बरे होऊन घरी, 9,844 नवे रुग्ण, राज्याचा मृत्यूदर दोन टक्क्यांवर


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. गुरुवारी 9,844 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 9,371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात काल एकूण 1,21,767 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,62,661 इतकी झाली आहे. काल 197 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,03,60,931 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,07,431 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,453 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


अकरावी सीईटी परीक्षेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी 


राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची (Maharashtra SSC Exam Result) परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक (optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाणार आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात घेण्यात येणारी अकरावी सीईटी परीक्षा नेमकी कशी असणार?  शालेय शिक्षण विभागानं या सीईटी संदर्भात एक शासन निर्णय जारी केला आहे. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. सीईटी परीक्षा ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. परीक्षा ही ओएमआर पद्धतीने घेतली जाईल. 


पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आजपासून खुला


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबा प्रशासनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर 15 एप्रिल 2021 पासून प्रादुर्भाव टाळण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आला होता. 4 जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन संबंधित गतिविधी राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. प्रकल्पाच्या 6 प्रवेशद्वारावरुन दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. मात्र ऑनलाईन बुकिंग प्रणाली बंद असल्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे. 1 जुलैपासून नियमाप्रमाणे पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्र 4 महिने बंद असणार आहे. ताडोबातील पर्यटन सुरु झाल्यामुळे रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांच्यात मोठं समाधानाचं वातावरण आहे. बफर क्षेत्रातील सफारी सुरु करण्यासाठी मात्र नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.


पॅनकार्ड आणि आधार कार्ड 30 जूनच्या आधी लिंक करा; हजार रुपये दंड भरावा लागू शकतो


पॅनकार्ड आणि आधार कार्ड संबंधित महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड सात दिवसात म्हणजे 30 जूनपर्यंत आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. हे वित्त विधेयक सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेले मंजूर केले. जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.  तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही तर त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 30 जूननंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करु शकणार नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.