मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. 


नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री


कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक द चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.


राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही : पोलीस महासंचालक 


राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत काल (बुधवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे. पुढे बोलताना पोलीस महासंचालक म्हणाले की, या काळात अनेक दुकान बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. परिस्थिति कठिण आहे. लोक जर बाहेर निघत असतील तर त्यांना आधी विचारलं जावं. विनाकारण मारहाण किंवा चार्ज लावू नये असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले की, जर कुणी कायद्याची पायमल्ली करत असेल. सार्वजनिक संपत्तीची नासधुस करत असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई होणार. आमची विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. मास्क घाला. पोलीस आपल्या बरोबर आहेत. 


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात 15 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात, काय आहेत गाईडलाईन्स



ब्रेक द चेन! काय आहेत निर्बंध?



  • आज सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.

  • मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.

  • उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू.

  • पुढचे 15 दिवस संचारबंदी.

  • अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.

  • घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये. 

  • आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. 

  • सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

  • लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.

  • जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.

  • पावसाळी पूर्व कामं सर्व सुरु राहतील.

  • अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.

  • हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.

  • रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.


काय बंद राहणार? 



  • प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर आजपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद 

  • रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही. 

  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद 

  • कामाशिवाय फिरण्यास बंदी 

  • सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद 

  • धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी 


राज्यात काल 58,952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 39,624 रुग्णांची कोरोनावर मात 


राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. राज्यात काल (बुधवारी) 58 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 39 हजार 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 29 लाख 05 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सद्यस्थिताला एकूण 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.64 टक्के आहे. 


मुंबईत 9 हजार 925 रुग्णांची नोंद 


मुंबईत काल (बुधवारी) 9 हजार 925 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 79273 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 44 हजार 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के झाला आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 87 हजार 443 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 40 दिवस झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :