मुंबई : मी हे निर्बंध आनंदाने लादत नाही आज परिस्थिती इतकी वाईट आहे की आपले प्राण वाचविणे यालाच आपले पहिले प्राधान्य आहे. मला टीकाकारांची पर्वा नाही  कारण आपल्याशी असलेल्या बांधिलकीला जागून मी पाऊले टाकतोय आणि म्हणूनच सर्वांनी एकमुखाने व एकत्र येऊन कोविडला परतविण्यासाठी सहकार्य करावे असे भावनिक व कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.  


उद्या (14 एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याचे आज मुख्यमंत्र्यांनी  जाहीर केले. 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी असून 144 कलम लागू करण्यात आले आहे. केवळ आवश्यक सेवा सुविधाच सुरु राहतील. सर्व प्रकारची वाहतूकही सुरूच राहणार आहे तसेच आर्थिक दुर्बल घटकांना देखील त्यांना त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य  देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


विमानांद्वारे ऑक्सिजन वाहतूक व्हावी


मुख्यमंत्री यावेळी विशेषत: ऑक्सिजन उपलब्धतेवर बोलले. ते म्हणाले की,  राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. सध्या 1200 मेट्रिक टन उत्पादन सुरु आहे. आणि आपण कोविड आणि नॉन कोविड अशा सर्वांसाठी मिळून जवळजवळ तितकाच ऑक्सिजन वापरत आहोत.  सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवायचे ठरविले आहे . केंद्राकडून आपल्याला इतर काही राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे मात्र ही ठिकाणे खूप दूरवरची असल्याने तो ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गे वाहनाने आणण्यासंदर्भात केंद्राला मदत करण्याची  विनंती केली आहे . विशेषत: हवाई दलाच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणता आला तर लवकर उपलब्धता होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी पंतप्रधानांना आपण पत्र लिहीत असल्याचेही ते म्हणाले.


रेमडिसीवीर उपलब्धता


देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संसर्ग कमी झाल्याने मधल्या काळात उत्पादन कमी झाले होते मात्र आता ते पूर्ववत होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे असेही ते म्हणाले.  


पंतप्रधानांकडे मागणी


कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण पंतप्रधानांकडे महत्वाच्या मागण्या केल्या आहेत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  मार्च महिन्यामध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर  परतावा दाखल करण्याची मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखी तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकेल असे ते म्हणाले. देशातील सर्व पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानांनी कोविड परिस्थितीत राजकारण न करण्याबाबत समज द्यावी असेही आपण सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.  


कोविडच्या सध्याची राज्यातील परिस्थिती


आज रोजी राज्यात 60 हजार 212 इतके उच्चांकी रुग्ण आढळले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की  12 एप्रिल पर्यंत राज्यात  34 लाख 58 हजार 245 इतके रुग्ण होते.  त्यापैकी 5 लाख 65 हजार सक्रीय आहेत. आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर वाढून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 40 दिवस इतका झाला आहे असेसंगून मुख्यमंत्री म्हणाले की सुविधा कमी पडताहेत.