कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत वेगवेगळ्या मुद्दांवर ट्वीट करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद देखील उभा राहिला. कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल केलेलं ट्वीट असेल किंवा उर्मिला मातोंडकर, जया बच्चन, अनुराग कश्यप यांच्याबद्दल केलेल्या मतप्रदर्शनामुळे कंगना अलिकडे नेहमी वादग्रस्त राहिली आहे.


अभिनेत्री कंगना रनौतच्या या ट्वीट्समागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केला आहे. कंगनाचा बोलवता धनी भाजप असून त्यांच्या सांगण्यावरुनच कंगना असे ट्वीस करत असल्याची टीका झाली. मात्र कंगनाने केलेल्या ट्वीटशी आम्ही सहमत नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी दादा म्हणाले की, विचार न करता बोलणाऱ्या ट्वीटचे आम्ही कधी समर्थन केलं नाही आणि करणार देखील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयकासंदर्भात केलेल्या ट्वीटवर पाठिंबा दर्शवताना आंदोलन करणारे दहशतवादी असल्याचा उल्लेख कंगनाने केला. यामुळे कंगनाच्या या नव्या ट्वीटचा नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.





कंगनाच्या ट्वीटवर चंद्रकांतदादा पाटील काय म्हणाले?


कंगनाच्या विचार न करता केलेल्या ट्वीटचे आम्ही कधीही समर्थन करु शकत नाही. कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल केलेलं ट्वीट असो किंवा आता कृषी विधेयकाबाबत केलेल्या ट्वीटशी आम्ही सहमत नाही. कंगना जे वाक्य वापरते त्याचा समाजात किती दुष्परिणाम होतो हे तिला कळतं की नाही हा प्रश्न आहे. पण शेवटी सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.


...तर त्याची चौकशी करा, हवेत बोलू नका- पाटील


नामवंत कलाकारांना जे महाराष्ट्रावर प्रेम करतात अशा सुभाष घई, नाना पाटेकर, अनुराग कश्यप यांना बदनाम करुन फिल्म इंडस्ट्री योगींच्या राज्यात हलवण्याचा डाव असल्याची टीका प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावर बोलताना हवेत बोलण्यापेक्षा सरकार तुमचे आहे चौकशी करा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या