मुंबई : आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहे. पण वर्ष 2014 ला याच महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी ध्वनिमताचा सोपस्कर मार्ग काढणाऱ्या फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी संख्याबळाची कोणतीही आकडेवारी दिली नव्हती. अशी कबुली राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना वर्ष 2014 ला दिलेल्या माहितीत दिली होती.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांसकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी किती संख्याबळाचे समर्थन असल्याचे पत्र दिले, त्या पत्राची प्रत देण्याची मागणी केली होती. राज्यपालाच्या अवर सचिव(प्रशासन)व जन माहिती अधिकारी उज्वला दांडेकर यांनी दिनांक 28.10.2014 ला संध्याकाळी 6.40 वाजता प्राप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची प्रत दिली. देवेंद्र फडणवीस बरोबर एकनाथ खडसे-पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे-पालवे या भाजप कोअर कमिटी सदस्याचे हस्ताक्षर असलेल्या पत्राची प्रत दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना कळविण्यात आले की भारतीय जनता पक्ष ही या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने मा. महोदय आपण आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी.

आत्ताची राजकीय परिस्थितीही तशीच आहे, मात्र, राज्यपाल आमदारांची यादी मागत आहे, संख्याबळाचे पत्र मागत आहे. त्यामुळं 2014 ला राज्यपाल कार्यालयाने जे नियम लावले ते आता का लावले जात नाहीत? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली आहे. यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचं सांगितलं.

काय होती 2014 ची राज्यातील परिस्थिती
2014 मध्ये शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली होती. पण, निकालानंतर सेना-भाजपने युती केली. त्यात भाजपनं 122 तर, शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या होत्या. यावेळी सुरुवातीला शिवसेना सोबत न आल्याने भाजपने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले होते. यावेळी कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा आमदारांची यादी भाजपकडून राजपालांना देण्यात आली नव्हती. अशी माहिती माहिती अधिकारात समोर आली होती.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादमधील वकिलाची उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक

Chhagan Bhujbal | अडीच वर्ष की पाच वर्ष ठाऊक नाही, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल - छगन भुजबळ | ABP Majha