औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर मंत्रीपदांच्या वाटपावरुन शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली. त्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यास आता विरोध होऊ लागला आहे. यासंदर्भात औरंगाबादमधील पेशाने वकील असलेल्या रत्नाकर चौरे या व्यक्तीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या प्रत्येक भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा असायचा. औरंगाबादच्या प्रचारात हाच महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र राज्याची सत्ता समीकरणं बदलली आणि शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले. नेमकं हेच औरंगाबादच्या एका मतदाराला पटलेलं नाही.

शिवसेनेनं भाषणात महायुतीला निवडून द्या, असे म्हटले होते. हिंदुत्वाचे रक्षण करणार, असे आश्वासन दिले. परंतु आता शिवसेना दुसऱ्याच पक्षांसोबत घरोबा करत असल्याने आमची फसवणूक झाल्याचे या मतदाराचे म्हणणे आहे. म्हणून त्याने शिवसेनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हा मतदार स्वत: वकील असल्याने तो कोर्टातही याबाबतची दाद मागणार आहे. पोलिसांनी जरी तक्रार घेतली असली तरी यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही, तसेच कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.