मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज 78 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुण्यातील बारामती इथे झाला. मात्र महाराष्ट्रावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत. वयाच्या 78 व्या वर्षी देखील शरद पवार हे राजकारणात प्रचंड सक्रीय आहेत. त्यांचा काम करण्याचा उत्साह आजही अनेक तरुणांना लाजवेल असाच आहे.


51 वर्षांची राजकीय कारकीर्द
देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी शरद पवारांची गणना केली जाते. शेती, क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा सर्वंच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारण, समाजकारणात रमणारे पवार हे क्रिकेटमध्येही तितकेच रमतात हे आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. आपल्या 51 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढ-उतारही पाहिले.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या संसद आणि विधिमंडळाच्या सर्व सभागृहांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानही पवार यांना मिळाला आहे. 1967 पासून आतापर्यंत सातत्याने पवार निवडून आले आहेत. 18 जुलै 1987 रोजी शरद पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तेव्हा पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले होते.

1984 मध्ये पवार पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते पुन्हा 1985 साली राज्याच्या राजकारणात परतले. 1991 मध्ये नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता. 26 जून 1991 रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. 1993 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांनी विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा पर्याय स्वीकारला. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर येथील परिस्थिती हातळण्यासाठी शरद पवारांकडे राज्याचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची ही त्यांची चौथी वेळ होती.

पण 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युती सरकार निवडून आलं. हा काँग्रेसचा राज्यातील पहिला पराभव होता. मात्र पवारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले. 1996 साली पवार लोकसभेवर निवडून गेले. मे 1999 मध्ये पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी सोनिया गांधींवर बरीच टीका केली.  यावेळी पवारांनी काँग्रेसशी फारकत घेऊन 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. कालांतराने राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी केली.

2004 साली पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. त्यानंतर 2009 साली पुन्हा मनमोहन सिंह यांचं सरकार सत्तेत आलं आणि पुन्हा एकदा पवारांवर कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

राजकारणाबरोबरच क्रिकेटही शरद पवारांच्या आवडीचा विषय आहे. 29 नोव्हेंबर 2005 रोजी ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवडून आले. तर 1 जुलै 2010 रोजी त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय ठरले.

2017 मध्ये 'पद्मविभूषण' हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देऊन शरद पवार यांना गौरवण्यात आलं.