Maharashtra Politics भंडारा : भंडाऱ्यातून (Bhandara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. कामगार कार्यालयाच्या माध्यमातून होत असलेल्या पेटी वाटपाचा कार्यक्रम चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्नांत एकच गोंधळ झाला आणि यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचीही माहिती पुढे आली आहे. यात अनेक महिला जखमी झाल्या आहेत. तर त्यातील पाच ते सहा महिला या गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे बोलले जात आहे.


चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी


भंडाऱ्यातील अग्रेसन भवन मंगल कार्यालयात महिला कामगारांसाठी पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून पेटी मिळावी, यासाठी भंडाऱ्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी भंडाऱ्यात अर्ज भरला होता. दरम्यान, आज नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अग्रेसन भवन येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम असल्याने अगदी मध्यरात्रीपासूनच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला येथे उपस्थित झाल्या होत्या. 


अचानक मोठी गर्दी या कार्यक्रमाला उसळल्याने ही गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. अशातच, सायंकाळच्या सुमारास येथील कर्तव्यावरील पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी महिलांवर लाठीचार्ज केला. यामुळे काही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर आता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एकीकडे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत असताना भंडाऱ्यामध्ये लाडक्या बहिणींवरच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली.


रानटी हत्तींच्या कळपामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत


गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने गत तीन वर्षांत प्रथमच गडचिरोली शहराची सीमा ओलांडून चामाेर्शी तालुक्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सध्या हा कळप मसली (वाकडी) जंगल परिसरात वावरत असल्याने पीक नुकसानीच्या भीतीपाेटी या भागातील शेतकरी धास्तावलेले आहेत.  मागील आठ दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप पाेर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत हाेता. आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची माेठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यानंतर गाेगावलगतच्या शेतशिवारात शनिवारी पीक पायदळी तुडविल्यानंतर रात्रीच्या सुमारास हा कळप खरपुंडी गावाजवळची कठाणी नदी ओलांडून सालईटाेला गावाच्या बाजूने माडेतुकूम परिसरातून गडचिराेली- धानाेरा मार्ग ओलांडला. टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरातून हा कळप पाेटेगाव मार्गाच्या बाजूने मसली गावाच्या दिशेने गेला. रविवारी सायंकाळपर्यंत याच भागात हा कळप वावरत हाेता.


हे ही वाचा