Bhandara News : राज्यात अलिकडे झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सर्वत्र अक्षरक्ष: दाणादान उडवली आहे. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातली उभी पीके जमीनदोस्त केलीय. तर अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरवला आहे. गेल्यावेळी झेलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीतून सावरत नाही तोच आणखी एक तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. असे असताना एक आशेचे किरण म्हणून पीक विमा कंपनीकडे शेतकरी आस लावून असतात. मात्र, अस्मानी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्याकडूनही एकप्रकारे थट्टाच केल्याचे बघायला मिळत आहे.


भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथे गेल्यावेळी झालेल्या अवकळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. परिणामी, त्यातीलच एका शेतकऱ्याने या नुकसानी बाबतचा पीक विमा काढला होता. मात्र, पीक विमा योजनेच्या लाभापेक्षा खताची एक बॅग महाग असल्यानं या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परिणामी, या संतप्त शेतकऱ्यांनी ही मिळालेली रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं, अशी उपहासात्मक मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 


पिकविम्याचे अठराशे रुपये  बँकेतून काढण्यासाठी पोलीस संरक्षण द्या!


प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षी आलेल्या अवकाळी पावसाचा लाभ देताना चोलामंडलम कंपनीनं शेतकऱ्याची चांगलीच बोळवण केली आहे. मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी येथील एका शेतकऱ्याला मिळालेली एक हजार आठशे रुपयांची रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी चक्क पोलीस संरक्षण द्यावं, अशी उपहासात्मक मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. तर, विमा योजनेच्या लाभापेक्षा खताची एक बॅग महाग असल्यानं अशा विमा रकमेचं करायचं काय? असा संतप्त सवालही उपस्थित केला आहे. तर एका शेतकऱ्यानं थेट स्वतःच्या खिशातून रक्कम काढून विमा कंपनीला देण्यासाठी पुढाकार घेतलाय. 


प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यात एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमेचा लाभ देण्यात येणार आहे. मागील वर्षी चोलामंडलम विमा कंपनीच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचा विमा काढला. दरम्यान, 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र, या नुकसानामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं ही पीक विमा कंपनीकडून अपेक्षित होतं. मात्र, तसे न होता मोबदल्यात मिळणारी रक्कम ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा करणारी असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहे. प्रशासनाने या विषयी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या