Beed News : घरी अठरा विश्व दारिद्र्य.. आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांसोबत कामात तर मदत केलीच. पण स्वतः कृषी दुकानात काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर या कष्टाचे चीज झाले आणि बीड मधील एका छोट्या गावचा तरूण पोलीस उपनिरीक्षक बनला..


खाकी वर्दीचं स्वप्न
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगरा एवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते.  हेच राज्यातल्या अनेक शेतकरी आणि शेतमजूरांच्या मुलांनी नुकत्याच झालेल्या पीएसआय (PSI) परीक्षेतून दाखवून दिले आहे. खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने मिळेल ते काम करून अभ्यास केला. आणि बीड (beed) जवळच्या शिदोड मधला ज्ञानेश्वर देवकते हा तरुण पीएसआय झाला. हलाखीच्या परिस्थितीतही आपलं शिक्षण बंद पडू दिलं नाही आणि याच जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर तो आज पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 


पोलीस निरीक्षक होण्याचं स्वप्न, कधी हमाली केली, कधी शेतात काम केलं
घोड्यावर बसून काढलेली ही मिरवणूक आहे ज्ञानेश्वर देवकते याची. ऊसतोड मजुराच्या कुटुंबात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने परिस्थितीवर मात करून पोलीस निरीक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने कधी हमाली केली तरी शेतात काम केलं. ज्ञानेश्वर पोलीस व्हावा यासाठी त्याच्या आई-वडिलांनी देखील शेतामध्ये मोलमजुरी करून त्याला पैसे पुरवले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा पोलीस होण्याची त्याची पहिली संधी ही सहा गुण कमी पडले म्हणून हुकली होती तरीदेखील त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरु केले आणि नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने 248 गुण मिळवले आहेत. ज्ञानेश्वरचे आई वडील ऊसतोड मजूर आहेत मोलमजुरी आणि स्वतःच्या तीन एकर शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा परिस्थितीतही त्याच्या आई वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही परिस्थितीमुळे ज्ञानेश्वर लाही वडिलांसोबत ऊस तोडावा लागला तर कधी शेतात मोलमजुरी करावी लागली 


पाच वर्ष अथक परिश्रम
पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वरने पाच वर्ष अथक परिश्रम घेतले. मोठ्या शहरात जाऊन अभ्यास करणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी बीड मध्येच राहून आपला अभ्यास पूर्ण केला. त्याच्या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्याचे कौतुक होताना दिसत आहे
ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली स्पर्धा परीक्षेसाठी आपलं गाव, घर सोडून शहरामध्ये अभ्यासासाठी जात आहेत. पण काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं,  हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.


संबंधित बातम्या


शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीज पुरवठा खंडीत नाही : ऊर्जामंत्री नितीन राऊत


Maharashtra Agriculture Budget Highlights : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?


Sunflower Farming : धुळ्यातील तऱ्हाडी परिसरात सूर्यफूल पीक बहरले!