सांगली : शहरातून पसरलेल्या कोरोनाने ग्रामीण भाग व्यापून टाकला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला असून अनेक गावात रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. मात्र सांगलीतील खानापूर तालुक्यातील बाणूरगड एक गाव असे आहे ज्या गावाने कोरोनाला दोन्ही लाटेत गावात शिरकाव करू दिला नाही.


जगात सगळीकडं कोरोनाच्या विषाणूने आणि त्याच्या लाटांनी थैमान घातलं आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट महाराष्ट्रामध्ये अधिक गंभीर बनली आहे. शहर, गावात कोरोनाचा मोठा प्रसार झाला. कोरोनाचा रुग्ण सापडत नाही असे जगात ठिकाण नसावे.  पण सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील बाणूरगड या गडाने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तीन तालुक्यांच्या सीमेवर हे बाणूरगड नावाचं गाव वसलं आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गावाजवळील बाणूरगड किल्ल्याला मोठं महत्व होतं. शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू गुप्तचर बहिर्जी नाईक यांची समाधी देखील येथे आहे असे सांगितले जाते. या किल्ल्या शेजारीच हे बाणूरगड गाव आहे.


गेल्या दोन वर्षांत कोरोना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. पण, तेराशे-साडे तेराशे लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. हे गाव डोंगराळ भागात आहे म्हणून इथे कोरोना पोहचू शकला नाही असे नाही. तर या गावाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसुत्रीचा वापर अत्यंत काटेकोरपणे करून अगदी गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच कोरोनाला प्रवेश करू दिलेला नाही. ग्रामपंचायती बरोबर आशा वर्कर यांनी देखील।सुरुवातीपासूनच कोरोनाबाबत सगळ्या गावात योग्य प्रबोधन केले. गेल्यावर्षी सगळीकडे कोरोना महामारीची पहिली लाट आली होती. तेव्हापासून गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी नियमितपणे कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळले आणि गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकास पाळण्यास सक्तीचे केले.




'बाहेरून आलेल्यास 15 दिवस सक्तीचे क्वॉरंटाईन. क्वॉरंटाईनची सोय गावात कुणी राहत नसलेल्या घरात केली जात असे. गावात कोणी पाहुणा जरी आला तरी त्याची लगेच कोरोना चाचणी करुन घेतली जाते. गावातील 45 आणि 60 वर्षांच्या वरच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. जरा जरी शंका आली तरी संबंध गावात सॅनिटायझेशन कार्यक्रम राबवला जातो. येथील ग्रामस्थ सुद्धा शासनाचे सगळे नियम पाळताना दिसतात. ग्रामदक्षता समिती आणि सगळ्या ग्रामस्थांमुळे आजपर्यंत आम्ही कोरोनाला गावात शिरु दिलेलं नाही. यापुढेही हाच निर्धार आहे.', असं सांगत कोरोना वेशीवरच थोपवण्याचे श्रेय लोकांना आणि लोकप्रतिनिधींना दिलं जातं.