मुंबई : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू, अशी ताकद भारतीय सैन्यात आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.


लडाख येथील गलवाण येथे चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भारत सरकार शाहिद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मजबूत उभे आहे. भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी सर्व भारतीय एकजुटीने उभे आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.


चीन धोकेबाज राष्ट्र आहे. चीनच्या भारतातील वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर भारतात बंदी घालण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले. चीन ने 1962 मध्ये भारताला धोका देऊन हल्ला केला होता. आता भारताचे सैन्य अधिक मजबूत असून चीनला धडा शिकवण्याची ताकद भारतीय सैन्यात आहे. आता भारतात आमचे कोरोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे युद्ध करण्याची आमची इच्छा नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.


भारत शांती आणि अहिंसेच्या तत्वावर ठाम आहे. पण जर चीन युद्ध करू इच्छित असेल तर कोरोनाशी होत असलेले युद्ध आणि सीमेवर चीनशी युद्ध आम्ही जरुर जिंकू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच भारतात चायनीज फूड हॉटेल आणि चायनीज खाद्यपदार्थांवर सर्वांनी स्वयंस्फूर्त बहिष्कार घालावा, चायनीज फूड हॉटेल वर बंदी घालावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केले.


संबंधित बातम्या