औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादच्या तारा पानाचा उद्धार केला आणि लोकांनी पानाचा हिरवा रंगही इस्लामशी जोडून टाकला. त्यामुळे विनाकारण औरंगाबादचं तारापान बदनाम झालं आहे.


तारा पान खाऊ नका म्हणून सोशल मीडियावर मोहीम सुरु झाली. असदुद्दीन यांची तारा पानावरची कोटी ऐकून ज्यांनी या तारा पानाला चमकवलं, त्या शफुरभाईंना मात्र प्रचंड वेदना झाल्या.

असदुद्दीन यांनी ज्या तारा पानाचा उल्लेख केला, त्या कोहिनूर मसाला पानाचा किस्सा मोठा रंजक आहे. हे पान खाल्ल्यावर माणसात कामोत्तेजना वाढते असा दावा केला जातो आणि त्याचा प्रभाव तब्बल 5 दिवस कायम राहतो, अशीही ख्याती आहे.

आता या पानात इतकं शक्तीवर्धक काय आहे, असा प्रश्न कोणालाही पडेल. या पानात स्पेशल कस्तुरी आहे. याची 1 किलोची किंमत 70 लाख रुपये आहे. काश्मिरच्या स्पेशल केसरची प्रतिकिलो किंमत 2 लाख रुपये आहे.

या पानात तब्बल 80 हजार रुपये प्रतिकिलोचा गुलकंद पडतो, तर पानाला सुगंधित करण्यासाठी बंगालमधला खास फ्रेग्रन्स असतो.
इतकंच नाही, तर कामोत्तेजना वाढवणारा एक सीक्रेट फॉर्म्युलाही या पानात आहे.

शिवाय अत्तराची बाटली आणि मोगऱ्यांच्या फुलासह स्पेशल पॅकिंग आहे. फक्त पुरुषांसाठीच नाही, तर 3 हजार रुपये किंमतीचं लेडीज स्पेशल पानही आहे. शफूरचाचा रोजच्या रोज 25 प्रकारच्या तब्बल 10 हजार पानांची विक्री करतात.

पुलं देशपांडे म्हणायचे, पाना इतका क्रांतीचा लाल रंग सापडणार नाही. पण आताच्या राजकारण्यांनी या पानाला जाती धर्माचा रंग देऊन त्याला बदनाम केलं.

पानाचा हिरवा रंग... आणि केसरचा भगवा रंग मिळूनच परिपूर्ण पानाची रसनिष्पत्ती होते... हे मात्र सगळेच विसरले...