Navnath Waghmare on Abdul Sattar : जालनामधील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये  बंद दाराआड दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. मनोज जरागे यांनी मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची भूमिका मांडली होती. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागणीबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे अब्दुल सत्तार भेटीनंतर म्हणाले होते. 


सत्तार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवणारे गद्दार आहेत 


आता अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने स्वतःची खूर्ची पक्की करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. नवनाथ वाघमारे म्हणाले की, अब्दुल सत्तार मांडवली करण्यासाठी आले असतील. जरांगे यांना पैसे रसद देण्यासाठी आले असतील. ते पुढे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहेत. ते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवणारे गद्दार आहेत. 


सत्तारांना मदत न करण्याची भाजपची भूमिका  


दुसरीकडे, भाजप नेत्यांनी थेट सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तारांची अडचण वाढू शकते. पण जर भाजपने आपल्या विरोधात काम केल्यास, आपण देखील इतर मतदारसंघात त्याच पद्धतीने काम करू असा अप्रत्यक्ष सत्तारांनी भाजपला इशारा दिला आहे. सत्तार यांनी मराठवाड्यात भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करू अस म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. मात्र या पराभवाला अब्दुल सत्तार जबाबदार असल्याची भावना भाजप नेत्यांमध्ये आहे. तर आपल्या कार्यकर्त्यांनी दानवेंना मदत केली नाही असं सत्तार देखील म्हणाले होते.


अब्दुल सत्तार यांच्या याच वक्तव्यानंतर भाजप आणि सत्तार यांच्यातील दरी वाढत गेली. आता वाद थेट एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्यापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नावात सत्ता असणारे सत्तार भाजपच्या विरोधाला कसे शमवणार किंवा उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या