सोलापूर : राज्यातला कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा फटका बळीराजाला बसणार आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यापुर्वीच सुरू झाले आहेत मात्र महाराष्ट्रातील मंत्र्यांनी दिलेला मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक विवेकानंद बालापल्ली यांनी दिली आहे.


त्यानंतर डीजीसीएच्या तपासणीला आणखी वेळ लागणार आहे. प्रत्यक्षात 8 ते 9 ऑगस्टला विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे मंत्र्यांनी घोषित केलेला 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टला जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यात विमानाची टेंडर देणे अपेक्षित होते.  कर्नाटक सरकारने फेब्रुवारीमध्ये टेंडर दिल्याने महाराष्ट्रापेक्षा आधी कर्नाटकमध्ये प्रयोग सुरु झाला आहे.

औरंगाबादमधील रडारच्या दोनशे किलोमीटर परिक्षेत्रातच हा प्रयोग होणार आहे, असा खुलासा कृत्रिम पावसासाठी कंत्राट मिळालेल्या कंपनीने केला आहे. यामुळे राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पूर्ण विदर्भात होणार नाही तसेच मराठवाड्यातील देखील काहीच भागात हा प्रयोग होणार आहे, अशी माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रातील बळीराजाला कृत्रिम पावसासाठी आणखी पाहावी लागणार आहे.



मागील आठवड्यात सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत. त्या ढगांवर रासायनिक घटकांची फवारणी कधी करावी याचा अभ्यास सुरू केला आहे. सुमारे 100 कोटी रुपये बजेट असलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या आवारात बसवण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्य छायेतीस ढगांचा अभ्यास करत आहेत.

सी बॅण्ड रडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रडारमधून पर्जन्य छायेतील ढगांवर आडव्या आणि उभ्या लहरी सोडल्या जातात. या लहरी ढगांना भेदून जी माहिती देतात त्यावर आधारित कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू होतील. दुष्काळी पट्ट्यातील ढगांचा, वातावरणाचा 24 वैज्ञानिकांची टीम अभ्यास करत आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ढगांवर सोडियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराइड असे घटक फवारले जातात. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या या उपकरणांच्या सहाय्याने किमान दोनशे वेळा फवारणीचे प्रयोग करुन त्याचे निष्कर्ष मांडले जाणार आहेत. सोलापूर विमानतळावर दोन विमानं यासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्राथमिक अभ्यासामध्ये पर्जन्य छायेतील ढगांमध्ये पाऊस पडण्याएवढी क्षमता असल्याचं दिसून आलं आहे. परंतु अभ्यासाचे पूर्ण निष्कर्ष हाती यायला वेळ लागेल.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा उपयोग करून कृत्रिम पावसासाठी पर्जन्यछायेच्या प्रदेशाची आलेली माहिती देशभरासाठी उपयोगी असणार आहे. पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद, अक्कलकोट ते कर्नाटकातील इंडीपर्यंत 120 पर्जन्य मापक यंत्र बसवलेली आहेत. सोलापूरचा 65 किलोमीटर परिघात हे प्रयोग केले जात आहेत. हवा मोजण्यासाठी चार टॉवर याठिकाणी आहेत.