Ravi Rana On Bacchu Kadu अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) महायुतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ आज अमित शाहांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या सभेला आता वादाची किनार लाभली आहे. याला कारण ठरलंय ते अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान. या मैदानावरूनच काल राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. अशातच आता या प्रकरणात दोन्हा गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येते आहेत.


'बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतात, असा आरोप रवी राणांनी केला आहे. बच्चू कडूंना चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हा पब्लिसिटी स्टंट केलाय', असा टोलाही त्यांनी बच्चू कडूंना लगावलाय.  त्यामुळे काल झालेल्या हाई वोल्टेज ड्रामानंतर आता राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूमध्ये शाब्दिक चकमक रंगताना दिसत आहे. 


बच्चू कडूंचा राजकिय पोळी शेकण्याचा प्रयत्न - रवी राणा 


यावर बोलताना रवी राणा यांनी म्हटलं की, 'अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा (Sharad Pawar) कार्यक्रम होता. ते सांस्कृतिक भवन मी बुक केलेले होते. मात्र, शरद पवार आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्या ठिकाणी येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आलं. तसेच परतवाडा येथे देखील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होत असल्याने ते ग्राउंड आधीच योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी आम्ही बुक केले असले तरी राहुल गांधींच्या सभेसाठी दिलं. असे असताना देशाच्या गृहमंत्र्याच्या सभेच्या अनुषंगाने आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान हे योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता. त्यामुळे बच्चू कडू (Bacchu Kadu) हे विनाकारण नौटंकी करत आहेत.' त्याचप्रमाणे ते आपली राजकिय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलाय. 


बच्चू कडूंचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय - रवी राणा


जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवसाआधीच अर्ज दिलेला होता. मात्र, तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळून घेतलं, असा आरोपही रवी राणा यांनी केलाय. बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना रवी राणा यांच्याकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर रवी राणा यांनी म्हटलं की, 'बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमीच प्रयत्न असतात. ज्या थाळी मध्ये खातो त्याच थाळीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत असतात'. बच्चू कडू यांच्यासोबत जी काही लोकशाही मार्गाने कायदेशीरदृष्ट्या लढाई करायची ती करण्यास मी तयार असल्याचा देखील यावेळी रवी राणा यांनी सांगितले. 


काय म्हणाले बच्चू कडू?


'ही निवडणूक शांततेत पार पडावी याची जबाबदारी आमची देखील आहे. मात्र, राणा दाम्पत्याचा असा प्लॅन होता की, हे प्रकरण अधिक चिघळावं आणि आमच्यावर लाठीचार्ज व्हावा, जेणेकरून आम्ही संतापात येऊन असे काही कृत्य करू ज्यातून आम्हाला अटक केली जाईल. असा आमचा कायमचा बंदोबस्त राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी केला होता. नवनीत राणा यांच्या म्हणण्यानुसारच येथील पोलीस यंत्रणा काम करते. त्यांचेच म्हणणे पोलीस ऐकत आहे. शिवाय एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा काम करत असल्याचेही आरोपही बच्चू कडू यांनी पोलिसांवर केलाय. प्रहारचा उमेदवार आणि बच्चू कडू यांना कशाप्रकारे अडचणीत आणता यईल आणि त्यांना कशी अटक करता येईल, याचा सुनियोजित कट राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी बोलताना केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या