Mahayuti News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election)  पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीने आम्हीच निवडणूक जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे  महायुतीत ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. याला कारण म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांनी  अजित पवारांबाबत (Ajit Pawar)  केलेले वक्तव्य....नागपूरच्या रामगिरी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत मित्र पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. रामगिरीवर झालेल्या बैठकीतली इनसाईड बातमी 'माझा'च्या हाती लागली आहे.  


महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी शनिवारी तब्बल साडे चार तास चालली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी बंगल्यावर साडे आठ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री नंतर एक वाजता संपली. या विशेष बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. या बैठकीत विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली असून अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत होऊन चांगली प्रगती ही झाल्याची माहिती आहे. 


... तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचं जाईल, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी


नागपूरच्या रामगिरी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत मित्र पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी नाराजी  व्यक्त केल्याची माहिती मिळतेय.  वादग्रस्त वक्तव्यं थांबली नाहीत तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचं जाईल, असे म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.


महायुतीच्या  नेत्यांसाठी ठरवली जाणार गाईडलाईन


यापुढे महायुतीला तडे जातील असे वादग्रस्त वक्तव्य परत होणार नाहीत याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू  करु नये यासाठी एक गाईडलाईन ठरवली जाणार आहे. 


हे ही वाचा :


पुतळा घाई घाईने उभारण्याची घाई का? महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट करा, उद्धव ठाकरेंची टीका