Sharad Pawar In Jode Maro Andolan : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. या घृणास्पद घटनेनंतर सर्वत्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती शिवरायांचा आजवर कधीच असा अपमान झाला नाही तो अपमान या घटनेनं झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून झालेल्या घटनेबद्दल माफी मागण्यात आली असली, तरी महाविकास आघाडीने मात्र आक्रमक पवित्रा घेत आज (1 सप्टेंबर) जोडे मारो आंदोलन केले. महाविकास आघाडीमधील दिग्गज नेते हुतात्मा पार्क ते गेटवे ऑफ इंडिया असा पायी मार्च काढण्यात आल्यानंतर गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर घणाघाती प्रहार केला. 


पायाला दुखापत असतानाही शरद पवार अनवाणी पायाने जोडे मारो आंदोलनात!


दरम्यान, या मोर्चामध्ये महाविकास आघाडीमधील शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी प्रकृती बरी नसतानााही आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशेषपणे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे आपल्या भाषणात कौतूक केले. विशेष म्हणजे शरद पवार आज वयाच्या 84व्या वर्षी पायाला जखम असल्याने पट्ट्या असतानाही अनवाणी पायाने आंदोलनात सहभागी झाले. दोन दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या मी सकाळी लवकर उठतो, या वक्तव्यावरून झोडपून काढले होते. तसेच शरद पवारांनी कधी असं सांगितलं आहे का? अशी विचारणा केली होती. याचीच प्रचिती आजच्या आंदोलनातून आली. त्यांनी पायाला पट्टी बांधत अनवाणी पायांनी सहभाग घेतला.  






दरम्यान आजच्या आंदोलनात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, संजय राऊत, आदित्य ठाकरे, भाई जगताप यांच्यासह अनेक बने नेते या आंदोलनामध्ये पोहोचले. गेट वे ऑफ इंडियावरून मोर्चाला संबोधित करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 


हा अपमान महाराष्ट्राचा आहे आणि याला कधीच माफी नाही


उद्धव ठाकरे म्हणाले की, ते म्हणतात आम्ही राजकारण करतोय, तर तुम्ही गजकर्ण करत आहात. या चुकीला माफी नाही. देशाच्या प्रवेश द्वारावर आम्ही सांगत आहोत. माफी नसती मागितली, तर शिल्लक ठेवलं नसतं महाराष्ट्रने असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मग्रुरीने  माफी मागितली, त्यात हाल्फ आणि फुल हसत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. माफी का मागितली सांगा? अशी विचारणा त्यांनी केली. नौदल दिवशी घाईने काही करायची गरज नाही. माफी कशाकशाची मागणार? राम मंदिर, महाराजांचा पुतळा अनेक घटना घडल्या त्यासाठी का? अशीही विचारणा त्यांनी केली. हा अपमान महाराष्ट्राचा आहे आणि याला कधीच माफी नसल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या