अहमदनगर जिल्ह्यातील ग्राम पंचायत सदस्य असलेल्या महिलेनं तिसरं मूल आपलं अपत्य असल्याचं नाकारलं होतं. मात्र डीएनए टेस्टनंतर तिचा खोटारडेपणा उघडकीस आला.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी नाकारली जाते. यातून सूट मिळवण्यासाठीच संबंधित महिलेने आपल्या पोटच्या पोराचंच मातृत्व नाकारलं.
दोनच अपत्यांची माहिती देऊन महिलेने निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मात्र विरोधी उमेदवाराने संबंधित महिलेला तीन मुलं असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. तपासात ही बाब खरी असल्याचं समोर आल्याने तिचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं.
याविरोधात महिलेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मात्र तिथेही दिलासा न मिळाल्याने तिने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. डीएनए टेस्टसाठी तयार झाल्याने महिला आणि तिच्या अपत्याची डिसेंबर महिन्यात डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यात हे मूल तिचं आणि पतीचंच असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे खंडपीठाने महिलेची याचिका फेटाळून लावली.