मुंबई : महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी आता अंतराची सीमा घालून देण्यात आली आहे. आधी उभारण्यात आलेल्या पुतळ्यापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दुसरा पुतळा उभारता येणार नाही, असा आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आला आहे.


पुतळा उभारणाऱ्या संस्थेवर संबंधित पुतळ्याची देखभाल आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुतळा उभारण्यापूर्वी त्या पुतळ्यासंबंधीच्या सर्व खर्चाची जबाबदारी पुतळा उभारणाऱ्या संस्थेची असेल.

रस्ते रुंदीकरण किंवा अन्य विकासकामांमुळे पुतळा हलवण्याचा प्रसंग उद्भवला, तर त्याला विरोध न करता आवश्यक ती प्रक्रिया स्वखर्चाने करण्याबाबत पुतळा उभारणाऱ्या संस्थेचं शपथपत्र घेण्यात येईल. परवानगीशिवाय पुतळा उभारणाऱ्यांवर कारवाई करुन पुतळा हटवण्यात येईल.

पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घ्यावी. ब्राँझ किंवा अन्य धातू, फायबरसारख्या साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या मॉडेलनुसारच पुतळा उभारावा, असा नियम असेल.

पुतळा उभारल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, जातीय तणाव वाढणार नाही याची खबरदारी घेत, स्थानिक पोलिस कार्यालयाकडून तसं ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचंही बंधन राहील.