मुंबई : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचं राज्य सरकारने केलेलं निलंबन राज्यपालांनी विशेषाधिकार वापरुन रद्द केलेलं नाही, असं स्पष्टीकरण राजभवनाने दिलं आहे. हा निर्णय राज्य सरकारनेच घेतल्याचं राजभवनाने स्पष्ट केलं आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी डॉ. पोखरणा यांचं निलंबन करण्यात आलं होतं. परंतु डॉ. पोखरणा त्यांचं निलंबन मागे घेऊन त्यांना नगरजवळच्याच शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. 


राजभवनाचं स्पष्टीकरण
याबाबत राजभवनाने म्हटलं आहे की, "डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन होणं किंवा रद्द झाल्यानंतर पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. पोखरणा यांचं निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकाराचा वापर केलेला नाही. डॉ. पोखरणा यांनी निलंबनाविरुद्ध राज्यपालांकडे दाद मागितली होती आणि राज्यपालांनी 16 मार्च रोजी राजभवनात सुनावणी ठेवली होती. सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने डॉ. पोखरणा यांचं निलंबन 5 मार्च रोजीच रद्द करुन पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक म्हणून केल्याचं राज्यपालांना सांगितलं. राज्यपालांच्या आदेशावरुन डॉ. पोखरणा यांचं निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचं आहे."


जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात 14 मृत्युमुखी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर 2021 रोजी आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी या विभागात कोरोनाचे 17 रुग्ण उपचार घेत होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबर 2021 रोजी या अग्निकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आलं होतं. अग्निकांड प्रकरणी ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.


Ahmednagar Hospital Fire : राज्यपालांकडून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द


जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे. परंतु प्रत्यक्षात कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणी सुरुवातीला दोन कर्मचारी आणि दोन डॉक्टर अशा चार जणांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. तर डॉ. सुनील पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला होता. 


या अग्निकांड प्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आला तरी तो अद्याप उघड झालेला नाही. त्यामुळे घटनेला जबाबदार कोण? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. चार महिने उलटूनही या दुर्घटनेतील 14 मृतांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द होऊन त्यांना शिरुर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.