नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांना  धमाकेदार पत्र लिहिले आहे, हे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे. या पत्रातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या गैरकारभाराकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्याच्या खात्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत, खात्यात घोळ, पदाचा दुरुपयोग तसेच येणाऱ्या काळात एकूणच महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर त्याचा होणारा वाईट परिणाम ह्याबाबत त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की नाना पटोले यांचे बोट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आहे. 


नाना पटोले यांनी या संदर्भात ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, "ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याच्या बातमीत तथ्य नाही. माझे पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही."


 




नाना पटोले यांनी पत्रात महाजेनको, म्हणजेच, राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वाशिंगच्या निविदा प्रक्रियेत घोळ, गैरमार्गाचा वापर आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून काम दिल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना महाजेनकोने दिलेल्या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती देण्याची विनंती त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर लोकहितास्तव या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी अशी ही मागणी केली आहे. कोळसा पुरवठा आणि वॉशिंगचे काम हे रुखमाई infrastructure प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे.         


पटोले पत्रात रुखमाई इन्फ्रावर गंभीर आरोप 



  •  कंपनीचे कुठलेही नेटवर्थ नाही

  •  कंपनीचा टर्नओव्हर नाही 

  • कंपनीला सेक्युरिटी क्लियरन्स नाही 

  • कंपनीला कोळसा वॉशिंगचा कुठलाही अनुभव नाही 

  • कंपनीने ज्या कंपनीसह जेव्ही केले आहे. ती कंपनी काळ्या यादीत आहे 

  • अटी, शर्ती पूर्ण केल्या नसताना गैरमार्गाने कामासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

  • महाजेनकोला हे वेळेवर कोळसा पुरवठा करू शकणार नाही.

  • याचा परिणाम महाजेनकोच्या वीज उत्पादनावर होणार आहे.          


नक्की कोणावर करत आहेत नाना आरोप? 


 पत्रात रुखमाई इन्फ्रा ही कंपनी संजय हरदवाणीची असल्याचे नानांनी नमूद केले आहे.  नाना पटोले यांच्या पत्राचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई ह्यांच्या व्यतिरिक्त शासनाच्या काही संबंधित सचिव, खनिज महामंडळाचे चेयरमन इत्यादींना लिहिले आहे. पण त्यांनी ज्या खात्यासाठी ही सर्व निविदा प्रक्रिया घेण्यात आली आहे. त्या ऊर्जा खात्याच्या मंत्र्यांना, म्हणजेच त्यांच्याच पक्षाचे मंत्री  नितीन राऊत यांना मात्र ह्या पत्राची कॉपी नाही.  नितीन राऊत ह्यांच्या खात्यासाठीच हा निविदा काढण्यात आला असून तो संजय हरदवाणीला देण्यात आला आहे संजय  हरदवाणी ही ऊर्जा मंत्री नितीन राऊत ह्यांच्या अत्यंत नजीकची व्यक्ती असल्याची माहिती सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाजेनको आणि संजय हरदवाणी ह्यांना निशाण्यावर घेताना नाना पटोले यांना नक्की कोणावर निशाणा साधायचा आहे हे स्पष्ट आहे 




नुकतीच डॉक्टर नितीन राऊत यांची आपण ईडीकडे तक्रार केल्याचे ट्विट एका अॅडव्होकेट तरुण परमार यांनी केले आहे. त्यातच आता ही तक्रार. एकंदरीत डॉक्टर नितीन राऊत ह्यांची चिंता वाढवणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. 
 
सध्या नाना पटोले आणि डॉक्टर नितीन राऊत ह्यांच्यात विस्तव ही जात नाही असे कळते. नाना पटोले - नितीन राऊत समीकरण बिघडण्यासाठी बरीच कारणे आहेत. याला पहिले कारण ठरले ते म्हणजे - प्रदेश अध्यक्षपद ज्यासाठी नाना आणि राऊत दोघे ही रेसमध्ये होते. दोघांनीही दिल्ली वाऱ्या केल्या.  या  दरम्यान काँग्रेसच्या आंतरिक लढ्यात जी मंडळी अनेक दशके कट्टर राऊत विरोधक होती त्यांनी नानाचा साथ दिला. त्यामुळे नाना राऊत विरोधकांच्या जवळ गेले.  प्रदेश अध्यक्ष झाल्यावर नितीन राऊत ह्यांना विधान सभा अध्यक्ष बनवून त्यांचे ऊर्जा खाते नाना पटोले यांना मिळावे यासाठी ही प्रयत्न झाल्यामुळे राऊत नाराज झाले. कॅबिनेटमधून निघून विधान सभा अध्यक्ष बनण्याची राऊत यांची बिलकुल इच्छा नसल्याचे कळते. हा राजकारणाचा भाग झाला. पण एकंदरीत आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे आता ते नक्की ह्या पत्रावर पुढे काय करतात हे बघावे लागेल.