Yavatmal News यवतमाळ : यवतमाळच्या पुसद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात शहरातील बीएसएनएल टॉवर जवळील दुरभाष केंद्रजवळ एक नवजात बाळ आढळून आले आहे. रणरणत्या उन्हात रस्त्यावरच्या कडेला हे बाळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात कुणी अज्ञात व्यक्तीने हे बाळ टाकून तिथून पळ काढला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सद्यस्थितीत या बाळाला शहर पोलीस स्टेशन मार्फत शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून पुढे यवतमाळ (Yavatmal News) येथील शासकीय रुग्णालय येथे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार बाळ पूर्णतः सुदृढ आहे. सध्या या बाळाच्या आई-वडिलांचा तपास पुसद पोलीस स्टेशनमार्फत (Yavatmal Police) सुरू आहे. मात्र या बाळाला असे रस्त्यात का आणि कोणी टाकले असावे, याचे कारण अद्याप अस्पस्ट असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहे. 


रणरणत्या उन्हात नवजात बाळाला रस्त्यावर सोडलं 


गेल्या तीन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा पारा 46 अंशावर गेला आहे. परिणामी हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याचा, तसेच गरज नसल्यास दुपारी घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच आज  एका नऊ महिन्याच्या चिमुकलीसह एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याचे बोलल्या जात आहे. बेलोरा येथील विद्या निलेश टेकाम असे मृत चिमुकल्या मुलीचे नाव आहे तर चिचमंडळ येथील दादाजी मारुती भुते असे सत्तर वर्षीय मृत वृद्धाचे नाव आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झाल्याचा अंदाज असून मृत्यूचे नेमके कारण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सांगता येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दूरध्वनीवर संपर्क केला असता दिली आहे.


पोलिसांकडून नवजात बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू


जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात यावर्षी 40 उष्मघाताच्या रुग्णावर उपचार सुरू आहे. तर  तहसील रुग्णालयात 14 आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात 66 असे एकूण 84 शीत कक्ष सुरू करण्यात आले असल्याची  माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. असे असताना आज दुपारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला नवजात बाळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वेळीच ही घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी, हा एक निर्दयीपणाचा कळस असल्याची भावना आता समाजातून उमटताना दिसत आहे. 


चक्क शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याच्या प्रयत्न 


सावकारीत पचवलेल्या शेतीचा ताबा सोडण्यास नकार देणाऱ्या एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याच्या प्रयत्नाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातील भांबेरी या  गावातला हा खळबळजनक प्रकार असून वादग्रस्त सावकार मनोहर शेळके आहे या व्यक्तीचे नाव आहे. तर मनब्दा गावातील हरिभाऊ गतमणे या शेतकऱ्याची चार एकर शेती सावकाराने पचवल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. यात पैसे परत केल्यानंतरही शेतीचा ताबा सावकारने दिला नसल्याचे सांगण्यात येतंय.


चौघांवर तेल्हारा पोलिसांत गुन्हे दाखल


परिणामी शेतकरी गतमणे यांचा मुलगा संदीप शेतात काम करत असताना त्याला 17 मे रोजी शेतातच चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. तर वृद्ध शेतकरी हरिभाऊ गतमणेंवर देखील असाच प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी देखील निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी सावकार मनोहर शेळकेच्या दोन मुलांसह चौघांवर तेल्हारा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या