मुंबई : आज म्हणजे 9 डिसेंबर रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातील दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट  झालं होतं. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी (Soniya Gandhi Birthday) यांचा तसेच खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha Birthday) यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. तर सोलापुरात जन्मलेल्या डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस (Dwarkanath Shantaram Kotnis) यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1900 : लॉन टेनिसमधील 'डेव्हिस कप' स्पर्धांना सुरुवात


टेनिस खेळाला सांघिक स्वरूपात आणण्याचे काम डी. एम. डेव्हिस या खेळाडूने केले. त्याने आपल्या नावाचा एक चषक बहाल करून 1900 सालापासून राष्ट्राराष्ट्रांमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी पहिले सामने घडवून आणले.  डेव्हिस कप स्पर्धांत भाग घेणाऱ्‍या प्रत्येक राष्ट्रास एकेरी लढतीसाठी दोन खेळाडू आणि दुहेरीसाठी दोन खेळाडू असा 4 खेळाडूंचा संघ नोंदवावा लागतो.  


1961 : पोर्तुगीजांच्या ताब्यातील दीव आणि दमण हे प्रांत भारतात समाविष्ट  


पोर्तुगीजांनी 1530 सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे.  पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.  1954  साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर 1961 सालातील आजच्या दिवशी दीव व दमण तर 18 डिसेंबर रोजी गोवा अशा अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या.  


बार्बाडोस अन् संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश


1966 साली आजच्याच दिवशी बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश झाला होता. तर 1971 साली संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश झाला होता. तर 1961 साली ब्रिटनपासून स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म झाला होता. 


1975 : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ


हजारो लोकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या बारामती-पुणे रेल्वेची सुरुवात आजच्या दिवशी 1975 साली झाली होती. या मार्गावर अनेक महत्वाची स्टेशन्स आहेत. त्यामुळं पुण्याला येण्यासाठी मोठ सोय उपलब्ध झाली.


1448: ला भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म. (Sant Surdas Birth Anniversary) 


सूरदास हे हिंदीच्या ब्रज बोलीभाषेत लिहिणारे एक भक्तकवी.  सूरदास यांचा जन्म रुणकटा नावाच्या गावात झाला. सूरसागर हा त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ.  सूरदासांची प्रसिद्धी ऐकून तानसेनाच्या मध्यस्थीने अकबर बादशहा त्यांना भेटायला आला. तेव्हा अकबराच्या सांगण्यावरून सूरदासांनी त्याची स्तुतीकवने लिहीण्यास नकार दिला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगानंतरही अकबराने सूरसागराचा फारसी अनुवाद करवला. सूरसागरातील भ्रमरगीत हा भाग साहित्यिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाने हिंदी भाषेचे सौंदर्य वाढवले असे म्हटले जाते.  मध्ये केले. 2015 मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.सूरसागराशिवाय सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयन्ती अशा इतर ग्रंथांचेही लिखाण केले.1580 मध्ये गोवर्धन जवळच्या परसौली गावात सूरदास यांचा मृत्यू झाला.


1868 : फ्रिटझ हेबर यांचा जन्म


नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. 1918 साली त्यांना नोबेल मिळाला होता. त्यांचा मृत्यू 29 जानेवारी 1934 रोजी झाला.


 1913 : पहिल्या महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म 


भारतातल्या पहिल्या महिला छायाचित्र पत्रकार  होमी व्यारावाला यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. 1938 मध्ये त्यांनी छायाचित्र व्यवसायाला प्रारंभ केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची छायाचित्रे काढली होती. तसेच स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना, घडामोडींची छायाचित्रे टिपली. 2011 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


1946 : सोनिया गांधी यांचा जन्म (Soniya Gandhi Birthday)


खासदार सोनिया गांधी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1946 साली झाला होता. मूळच्या इटलीच्या असलेल्या सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्याशी लग्न केलं अन् त्या भारतात आल्या.  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या त्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिल्या. त्यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 7 वर्षांनी 1998 साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. 2017 सालापर्यंत 22 वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. या काळात काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत देखील होतं. सोनिया गांधी यांचा 2004 ते 2014 या काळात भारतातील सर्वात जास्त शक्तिशाली राजकारणी म्हणून समावेश झाला होता. 2007 मध्ये फोर्ब्जने जगातील तिसरी सर्वात जास्त शक्तिशाली महिला म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. संसदीय राजकारणात देखील त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे.  


1946: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म (Shatrughan Sinha Birthday)


शत्रुघ्न सिन्हा हे आघाडीचे अभिनेते आणि नेते. त्यांनी अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा. त्यांना लव, कुश अन् सोनाक्षी ही तीन अपत्य. शत्रुघ्न सिन्हा भाजपमध्ये असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. यानंतर त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली अन् काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 मध्ये पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसमध्ये असताना सततच्या पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने जिंकली. शत्रुघ्न सिन्हा सुमारे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले.  


1942 : डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा मृत्यू


सोलापुरात जन्मलेल्या द्वारकानाथ शांताराम कोटणीस (Dwarkanath Shantaram Kotnis) यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. दुसर्‍या महायुद्धात त्यांनी केलेल्या सेवेसाठी त्यांना चीनमध्ये मोठ्या आदराने स्मरण केले जाते. भारत आणि चीन यांच्यातील मैत्रीचे प्रतीक मानले जाणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे पाच तरुण डॉक्टरांपैकी एक होते ज्यांना 1938 मध्ये दुसऱ्या महायुद्धात मदत कार्यासाठी चीनला पाठवण्यात आले होते. डॉ द्वारकानाथ कोटणीस यांचे वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी चीनमध्ये सेवा सुरू असताना निधन झाले.  10 ऑक्टोबर 1910 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे जन्मलेल्या द्वारकानाथ कोटणीस यांनी बॉम्बे विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते.


1997: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत के. शिवराम कारंथ यांचे निधन


शिवराम कारंथ यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1902 मध्ये झाला होता. ते ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील 'यक्षगान' या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या 47 कादंबऱ्या या केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1997 रोजी त्यांचे निधन झाले. 


इतर महत्त्वाच्या घटना


1878 : कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
1900 : अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
1993 : चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.
2007 : भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.
2009 : प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.
2012 : बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1921 )
1753 : थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.
1892 : इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
1998 : बेलूर मठाची स्थापना झाली.