5th May In History:  प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटनांचा परिणाम इतिहासातील कालखंडावर नव्हे तर पुढील काळावरही होत असतो. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. शोषण मुक्त समाजाचा कृतीशील विचार मांडणाऱ्या कार्ल मार्क्सचा आज जन्म दिवस आहे. तर, मराठीतील निसर्गकवी, बालकवी अशी ओळख असणारे त्र्यंबक बापूजी ठोमरे अवघ्या 28 व्या वर्षी जगाचा निरोप आजच्या दिवशी घेतला. 


1818: शोषण मुक्त समाजाचा कृतीशील विचार मांडणाऱ्या कार्ल मार्क्सचा जन्म (Karl Marx Birth Anniversary)


जगातील महान साम्यवादी लेखक, इतिहासकार, राजनितीक सिद्धांतकार, पत्रकार कार्ल मार्क्सचा (Karl Marx) जन्म 5 मे 1818 रोजी झाला. साम्यवादी विचारसरणीचा जनक अशी कार्ल मार्क्सची ओळख आहे. भांडवलशाहीच्या विचारसरणीमुळे होणाऱ्या शोषणावर त्यांनी साम्यवादी विचारसरणी मांडली. 


कार्ल मार्क्सने जर्मनीमध्ये कामगारांना संघटित करत कम्युनिस्ट लीगच्या स्थापनेत सक्रिय योगदान दिलं. त्याचा मित्र फेड्रिक एगंल्स याच्या मदतीने त्याने कम्युनिस्ट जाहीरनामा प्रकाशित केला.


कार्ल मार्क्सने 'दास कॅपिटल' (भांडवल) हा महान ग्रंथ लिहिला. त्याचा पहिला भाग त्याने 1867 साली प्रकाशित केला. दास कॅपिटलचा दुसरा भाग त्याचा मित्र एगंल्सने संपादित आणि प्रकाशित केला.  भांडवल या गाजलेल्या ग्रंथातून मार्क्सने भांडवलशाहीकडून कामगारांच्या होणाऱ्या शोषणावर भाष्य केले. 
 'वर्गसंघर्ष' हा सिद्धांत मार्क्सच्या 'वैज्ञानिक साम्यवादाचा' कणा आहे. कार्ल मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादात द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, अतिरिक्त मूल्य सिद्धांत, वर्गसंघर्ष, राज्यविहीन व वर्गविहीन समाज या साऱ्यांचा समावेश होतो.


उत्पादन व्यवहार, उत्पादनशक्ती, उत्पादनसंबंध, त्यातील अंतर्विरोध, खाजगी मालकी, शासनसंस्था, विचारसरणी, क्रांती इत्यादी मूलभूत संकल्पनांचा विचार करून मार्क्सने मानवाचा उत्पादन व पुनरुत्पादनाचा व्यवहार, त्यातील उत्पादनशक्ती व उत्पादनसंबंध यांचे द्वंद्वात्मक नाते यांच्या आधारे इतिहासाचा तसेच त्याच्या काळातील वर्तमानाचा अभ्यास केला. या अभ्यासातूनच त्याने निष्कर्ष काढला की मानवी इतिहास हा वर्गलढ्याचा इतिहास आहे व उत्पादनसाधनांवरची भांडवली खाजगी मालकी हे आजच्या सर्व प्रश्नांचे मूळ आहे, अशी मांडणी मार्क्सने केली.


भांडवलदार ज्याप्रमाणे माणसाचे शोषण करतात, त्याचप्रमाणे ते निसर्गाचेही शोषण करतात. नफा कमावणे हा त्यांचा एकमेव हेतू असल्याने नफा कमावण्यासाठी ते माणसाचे शोषण करतात, त्याचप्रमाणे ते निसर्गाचेही शोषण करतात. शासनसंस्था, राजसत्ता हे प्रस्थापितांच्या हातामध्ये ठेवून समाजाचे परिवर्तन करता येणार नाही, असे कार्ल मार्क्सने म्हटले. 


1864 मध्ये लंडनमध्ये 'इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन' ची स्थापना करण्यात मार्क्सने फार महत्त्वाची भूमिका बजावली. युनियनच्या सर्व घोषणा, धोरणे आणि कार्यक्रम मार्क्सनेच तयार केले होते. युनियनचे काम वर्षभर सुरळीत चालले, पण बाकुनिनच्या अराजकतावादी चळवळीमुळे, फ्रेंच-जर्मन युद्धामुळे आणि पॅरिस कम्युन्समुळे 'इंटरनॅशनल लेबर युनियन' विसर्जित झाली. 


कार्ल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर काही प्रमाणात कमी झाली. जगभरात समाजवादी, साम्यवादी विचारांची लाट सोव्हिएतच्या विघटनानंतर ओसरली. मात्र, मागील काही दशकांपासून सतत असणारे आर्थिक मंदीचे सावट, मूठभरांच्या हाती संपत्तीचे होणारे केंद्रीकरण, वाढती गरीबी आदी कारणांमुळे पुन्हा एकदा मार्क्सने मांडलेल्या विचारांची, मार्क्सवादाची उजळणी होऊ लागली आहे. मार्क्सवादी विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात.ते वर्ग संघर्षाचे प्रणेते होते. 


1916:   भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्म


भारताचे अकरावे राष्ट्रपती व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते  ग्यानी झैलसिंग यांचा जन्म शेतकरी कुटुंबात फरीदकोट (पंजाब) जिल्ह्यातील सांधवान या गावी झाला.  भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे ते प्रभावित झाले आणि स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात काँग्रेसची शाखा सुरू केली होती. त्यांच्या या कृतीबद्दल ब्रिटिश शासनाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावून तुरुंगात डांबले. त्यातून सुटका झाल्यानंतर ते महात्मा गांधीजींच्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करुन (1946) शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्घ चळवळ उभी केली, तेव्हा त्यांना पुन्हा पाच वर्षांची शिक्षा झाली होती. 


ग्यानी झैलसिंग यांनी 1972 ते 1977 या कालावधीत पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात हरीत क्रांती झाली.लोकसभेच्या १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी झैल सिंग यांच्याकडे गृहखाते सोपविले. या काळात पंजाबात, विशेषतः अमृतसरमध्ये भिंद्रानवाले आणि आसाममध्ये आसाम गणतंत्र परिषद या गटांनी राज्यशासनाने हादरुन सोडली होती. झैल सिंगांनी शक्यतो शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 


1982 मध्ये ते इंदिरा काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. त्यांची राष्ट्रपतीपदा दरम्यानची कारकीर्द काहीशी वादग्रस्त ठरली. 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार पूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, मोहिमेबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. या मोहिमेनंतर शीख समुदाय झैलसिंग यांच्यावर संतप्त झाला होता. या घटनेबाबत त्यांनी अकाल तख्तासमोर माफी मागितली. राष्ट्रपतीपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. 


1918  : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन


उणीपुरी दहा वर्षांची काव्य कारकीर्द असणारे  त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे आज निधन झाले. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. 


1907 मध्ये जळगावमध्ये पहिले महाराष्ट्र कवी संमेलन पार पडले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली. 


मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह. ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास आदी त्यांच्या कविता आजही प्रसिद्ध आहेत. 


2006:  ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचे निधन


हिंदी चित्रपटसृष्टीतील महान आणि आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेले नौशाद यांचे निधन आजच्या दिवशी मुंबईत झाले. चित्रपटांमध्ये शास्त्रीय संगीताचा वापर लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. 


1940 मधील प्रेम नगर या चित्रपटाला त्यांनी पहिल्यांदा संगीत दिले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. माला, नयी दुनिया, पहले आप, शहाजंहा, दर्द, एलान, अनोखी अदा, बैजू बावरा, अमर, मदर इंडिया, मुघल-ए-आझम, गंगा जमुना, पाकिझा आदी गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. 


हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल नौशाद यांना अनुक्रमे 1981 आणि 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 मे 2006 रोजी त्यांचे निधन झाले.


 


इतर महत्त्वाच्या घटना: 


1901 : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.


1984 :  फु दोरजी हे ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय ठरले.


1989: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन.


2010 : सर्वोच्च न्यायालयाने संशयित गुन्हेगारांवरील नार्को विश्लेषण, ब्रेन मॅपिंग किंवा पॉलीग्राफ चाचण्यांसारखे तपास नाकारले आणि याला वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन म्हटले.


2017 : इस्रोने दक्षिण आशिया उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला.