2nd May In History : वर्षातील प्रत्येक दिवसाप्रमाणेच इतिहासातील अनेक चांगल्या-वाईट घटनांचीही नोंद 2 मे या दिवशी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्म 2 मे रोजी झाला. तर महान चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी या दिवशीच या जगाचा निरोप घेतला. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी


1519 : इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंची यांचे निधन (Leonardo da Vinci) 


युरोपच्या 15 व्या शतकातील प्रबोधनकाळातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे लिओनार्डो दा विंची. प्रसिद्ध चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ अशी ओळख असलेल्या लिओनार्डो दा विंची यांचं निधन आजच्या दिवशी म्हणजे 2 मे 1519 रोजी फ्रान्समध्ये झालं. लिओनार्डो दा विंची यांचे 'मोनालिसा' (Mona Lisa) हे ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध चित्र, त्याच्यातील गुढ रहस्यामुळे कायम स्मरणात राहतं. त्याचसोबत येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित 'द लास्ट सफर' हे चित्र तसेच 'मॅडोना ऑफ द रॉक्स' हे चित्र जगप्रसिद्ध आहे.


1920 : शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म


डॉ. वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. वसंतराव देशपांडे यांनी असद अली खाँ, सुरेशबाबू माने, अमानत अली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी आफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव देशपांडे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये वसंतरावांची भूमिका गायक राहुल देशपांडे यांनी केली होती. 


1921 : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक भारतरत्न सत्यजित रे यांचा जन्म (Satyajit Ray)


20 व्या शतकातील महान भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे (Satyajit Ray) यांचा जन्म 2 मे 1921 रोजी कोलकाता या ठिकाणी झाला. फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक जीन रेनुआ यांना भेटल्यानंतर आणि लंडनमध्ये इटालियन चित्रपट 'लाद्री डी बिसिक्लेटा' पाहिल्यानंतर त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली.


सत्यजित रे यांनी त्यांच्या कारकिर्दीत 37 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात फीचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील 'सर्वोत्कृष्ट मानवतावादी दस्तऐवज' पुरस्कारासह एकूण अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या पथर पांचाली या पहिल्या चित्रपटाला मिळाले. 'अपराजितो' आणि 'अपूर संसार'सह त्याच्या प्रसिद्ध अपू ट्रायलॉजीमध्ये हा चित्रपट समाविष्ट आहे.


सत्यजित रे यांनी स्वत: चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक कामे हाताळली. त्यामध्ये पटकथा लिहिणे, कलाकार कास्ट करणे, पार्श्वसंगीत तयार करणे, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन, संपादन आणि प्रचारात्मक साहित्य तयार करणे याचा समावेश आहे. चित्रपट बनवण्यासोबतच ते कथा लेखक, प्रकाशक, चित्रकार आणि चित्रपट समीक्षकही होते. राय यांना जीवनात अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात अकादमी मानद पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविविभूषण आणि भारतरत्न यांचा समावेश आहे.


1949 : महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू 


महात्मा गांधीं यांच्या हत्येच्या खटल्यावर सुनावणी 30 एप्रिल 1949 पासून पंजाब उच्च न्यायालयात सुरु झाली. ही सुनावणी 60 दिवस चालली आणि 21 जून रोजी यातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये नथूराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांना फाशीची शिक्षा झाली, तर इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती.


1950 : फ्रान्सची वसाहत असलेले चंद्रनगर भारताकडे सोपवण्यात आलं


फ्रान्सची वसाहत असलेले चंद्रनगर (Chandernagore) 2 मे 1950 रोजी भारताच्या ताब्यात देण्यात आलं. चंदननगर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यातील एक शहर आहे. हे चंद्रनगर म्हणून ओळखले जात असे आणि फ्रान्सची वसाहत होती. ती 1950 मध्ये भारतात विलीन झाली. हे कोलकात्याच्या उत्तरेस 30 किमी अंतरावर आहे.चंद्रनगर सध्या कोलकाता महानगर प्रदेशाचा भाग आहे आणि कोलकाता मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी अंतर्गत येतो.


2003: भारताचा पाकिस्तानशी पुन्हा संवाद सुरू


भारताने पाकिस्तानशी राजकीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची घोषणा 2 मे 2003 रोजी केली. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे संबंध तोडले गेले.