23 November In History : इतिहासात नोंदवलेल्या प्रत्येक तारखेप्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी देखील अनेक घटनांची नोंद आहे.  या तारखेच्या बहुतांश घटना दुःखद घडल्या आहेत. भारताच्या औद्योगिकरणाचे प्रमुख शिल्पकार असलेले उद्योजक वालचंद हिराचंद (Walchand Hirachand Doshi) यांचा आज जन्मदिन आहे. भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ सर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा (Sir Jagadish Chandra Bose) आज स्मृतीदिन आहे. 



1882 : भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार वालचंद हिराचंद यांचा जन्म Walchand Hirachand Doshi Birth Anniversary 


आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक वालचंद हिराचंद यांचा आज जन्मदिन. वालचंद यांचे शिक्षण औरंगाबाद, सोलापूर, मुंबई व पुणे येथे झाले. मात्र, त्यांच्या दोन कर्ते भाऊ प्लेगसाथीत मृत्यूमुखी पडले. वालचंद यांनी शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्याचे ठरविले. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी मक्तेदारीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. रेल्वेची कामे ठेकापद्धतीने घेऊन ती स्वतःच्या आर्थिक बळावर आणि धाडसावर यशस्वीपणे पार पाडणारे व्यावसायिक लक्ष्मण बळवंत फाटक आणि वालचंद या दोघांनी मिळून येडशी ते तडवळ हा जवळपास 11 किमी लांबीचा रेल्वेमार्ग बांधला. या रेल्वे मार्गाला बार्शी लाईट रेल्वे म्हणून ओळखले जाते. वालचंद हिराचंद यांना पुढे रेल्वेशी संबंधित अनेक कामे मिळाली. 


मुंबईतील बोरीबंदर ते करीरोड यांदरम्यानचे चार रूळांचा मार्ग तयार करण्याचे काम, तसेच हार्बर मार्गावरील रे रोड ते कुर्ला हे रूळमार्गाचे कामही कमी वेळात व कमी खर्चात वालचंदांनी पूर्ण केले. पूर्वीची जुनाट कार्यपद्धती, साधने व धोरणे यांचा त्याग करून वालचंद यांनी सुधारित पद्घती व अवजारे, नवीन प्रगत तंत्रे व दूरदर्शी धोरणे यांचा अंगीकार केल्यामुळेच त्यांना यश लाभले. फाटक-वालचंद जोडीने 1912 च्या सुमारास ठेकेदार म्हणून खूप प्रतिष्ठा मिळविली.


पहिल्या महायुद्ध काळात बांधकाम-क्षेत्रातील नवनव्या संधी वालचंदांना लाभत गेल्या. मुंबई नगरपालिका, पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते इत्यादींची बांधकामे त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. तसेच अनेक ठिकाणी लष्करी शिपायांसाठी बराकी बांधल्या. खडकी येथील दारूगोळ्याच्या गुदामाचे धोक्याचे काम अल्प मुदतीत त्यांनी पूर्ण केले. फाटक-वालचंद कंपनीने भांडवलबाजारात आपल्या भागांची विक्री जाहीर केली, मुंबईतील 'नेपियर फाउंड्री' ही ओतशाला खरेदी केली, तत्कालीन मध्य प्रांतातील एका कोळसा खाणीमधील काही हक्क मिळवले, त्याचप्रमाणे नवनवीन उपकरणे खरेदी करून मोठी गुंतवणूक साध्य केली. उद्योगव्यवसायातील प्रत्येक बारीकसारीक तपशील विचारात घेऊन, तसेच नियोजित कालमर्यादा कसोशीने पाळून वालचंद यांची कंपनी उच्च दर्जाची कामे कमी दर लावून साध्य करू लागली. 


दादाभाई नवरोजींच्या प्रेरणेने देशी उद्योगंधद्यांच्या भरभराटीचे स्वप्न त्यांनी आयुष्यभर जोपासले व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते अविरत झगडत राहिले. आर्थिक स्वातंत्र्य ही राजकीय स्वातंत्र्याची पहिली पायरी होय, ही त्यांची विचारसरणी होती व त्यानुसार ब्रिटिशांच्या दास्यातून व पकडीतून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त करण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. 


भारताच्या किनाऱ्यावरून चालणारी जहाजवाहतूक ही पूर्णतया ब्रिटिश जहाजकंपनीच्याच अखत्यारीत असणे, ही गोष्ट वालचंदांना सदैव खटकत होती. ही जहाजवाहतूक भारतीयांच्या हाती येण्याच्या दृष्टीने वालचंदांनी सरकारशी सतत वाटाघाटी केल्या. या गंभीर प्रश्नाला त्यांनी वृत्तपत्रांद्वारा वाचा फोडली, प्रसंगी राजकीय पुढाऱ्यांशीही संपर्क साधला. अखेर नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने वालचंदांनी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही भारतीय जहाजकंपनी स्थापन केली. वालचंदांच्या अथक प्रयत्‍नांमुळे ‘डफरिन’ ह्या बोटीवर भारतीय युवकांना नाविक शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. याच सुमारास वालचंद हॉलंडला गेले व तेथे त्यांनी जहाजबांधणीच्या कारखान्यांचा अभ्यास केला. स्वदेशी परतल्यावर विशाखापटनम् येथे त्यांनी नौकाबांधणी केंद्र स्थापन केले.  


भारतात विमाननिर्मितीचा कारखाना उभारण्याचा त्यांना सदैव ध्यास लागून राहिला होता. त्या प्रेरणेने वालचंदांनी आपला अमेरिकन मित्र पॉले याच्या साहाय्याने, तसेच म्हैसूरच्या महाराजांच्या संमतीने बंगलोर येथे विमाननिर्मितीचा कारखाना उभारला. भारतीय अभियंत्यांनी आराखडा तयार करून आणि संपूर्णपणे देशी सामान वापरून बनविलेले पहिले ग्लायडर याच कारखान्यामधून समारंभपूर्वक उडविण्यात आले.  ही कंपनी म्हणजे हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड. पुढे याच कंपनीचे नामकरण हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड  असे करण्यात आले. भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. 


1937 :  भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ सर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे निधन Sir Jagadish Chandra Bose Death Anniversary 


भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.


इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात 1885 ते 1915 अशी 30 वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. 


विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले.


1980 : इटलीतील भूकंपात 2600 लोकांचा मृत्यू 


इटलीच्या दक्षिण भागात  23 नोव्हेंबर 1980 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात तब्बल 2600 लोकांचा मृत्यू झाला होता. पुढे अनेक दिवस इटलीला या धक्क्यातून सावरता आले नव्हते.   


1996 :  इथियोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 767 या विमानाचे अपहरण


आदिस अबाबा ते नैरोबी या मार्गावर इथियोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 767 या विमानाचे अपहरण करण्यात आले. परंतु, कमी इंधनामुळे हे विमान हिंदी महासागरात कोसळले. या घटनेत विमानातील  175 प्रवासी, पायलट आणि तीन अपहरणकर्त्यांसह 125 जणांचा मृत्यू झाला. 


इतर महत्त्वाच्या घटना : 


1755: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. 
1897: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म
1923: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म
1930: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म.
1971: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
1992: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.