18 April In History : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 1857 च्या लढ्याला विशेष महत्व आहे. 1857 चा स्वातंत्र्यलढा हा भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा असल्याचं मानला जातो. या लढ्यामध्ये तात्या टोपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तात्या टोपे यांनी ब्रिटिशांविरोधात सर्व भारतीयांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न शेवटी अपयशी ठरला आणि ब्रिटिशांनी त्यांना पकडून 18 एप्रिल 1859 रोजी फाशी दिली. यासह देशभरातील आणि जगभरातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे,


1612-  मोगल सम्राट शाहजहानने मुमताजशी लग्न केले


18 एप्रिल 1612 या दिवशी मोगल सम्राट शाहजहानने मुमताज महल हिच्यासोबत लग्न केलं. शाहजहानची मुमताज ही आवडती पत्नी होती. तिच्या स्मरणार्थ त्याने आग्र्यामध्ये ताजमहलची निर्मिती केली. ताजमहल हा उत्कृष्ठ स्थापत्यशैलीचा नमूना असून जगातले सातवे आश्चर्य मानलं जातं. 


1858 :समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म


स्त्री शिक्षणाासाठी आणि विधवांच्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणारे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे (Dhondo Keshav Karve) यांचा जन्म 18 एप्रिल 1858ल रोजी झाला. महर्षी कर्वे यांनी आपले जीवन महिलांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांनी मुंबईत स्थापन केलेले SNDT महिला विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. 1891 ते 1914 पर्यंत ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे शिक्षक होते. सन 1915 मध्ये महर्षी कर्वे लिखित ‘आत्मचरित्र’ हे मराठी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले. 1942 मध्ये काशी हिंदू विद्यापीठाने त्यांना डॉ. लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. 1954 मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाने त्यांना LLD ची पदवी बहाल केली. सन 1955 मध्ये भारत सरकारने त्यांना "पद्मविभूषण" देऊन सन्मानित केले. वयाची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर, 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ची पदवी बहाल केली. 1958 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान "भारतरत्न" देऊन गौरवले. भारत सरकारच्या पोस्टल टेलिग्राफ विभागाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला होता. 19 नोव्हेंबर 1962 रोजी वयाच्या 104 व्या वर्षी महर्षी कर्वे यांचे निधन झाले.


1859: तात्या टोपे यांना फाशी


तात्या टोपे (Tatya Tope) हे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख लष्करी नेते होते. 1857 च्या महान बंडातील त्यांची भूमिका सर्वात महत्वाची, प्रेरणादायी आणि अद्वितीय होती. तात्या टोपे हे  10 मे रोजी मेरठमधून 1977 च्या उठावाला सुरुवात झाली. लवकरच क्रांतीची ठिणगी संपूर्ण उत्तर भारतात पसरली. परकीय सत्तेचे जोखड फेकून देण्यासाठी तात्या टोपे यांनी पुढाकार घेतला आणि कानपूरमध्ये नानासाहेब पेशवांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. 


झाशीची राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब पेशवे, रावसाहेब, बहादूरशहा जफर यांना पराभव पत्करावा लागला, तरीही तात्या टोपे यांनी हार मानली नाही आणि ते लढत राहिले. नरवारचे राजा मानसिंग यांनी विश्वासघात केल्यामुळे तात्या टोपे यांना 7 एप्रिल 1859 रोजी ब्रिटिशांनी पकडले. 15 एप्रिल 1859 रोजी तात्यांना शिवपुरी येथे बंडखोरी आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध केल्याच्या आरोपाखाली कोर्ट मार्शल करण्यात आले. पुढे तीन दिवसानंतर म्हणजे 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.  


1902 - डेन्मार्कने प्रथम गुन्हेगारांच्या ओळखीसाठी बोटांचे ठसे नोंदवण्यास सुरुवात केली.


1916 : हिंदी आणि मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म


ललिता पवार (Lalita Pawar) या एक हिंदी आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी झाला. ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. बॉलिवूडमध्ये स्त्री खलनायिका पात्र त्यांनी आजरामर केलं. हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटसृष्टीत 700 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 70 वर्षांहून अधिक काळातील प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. पवार यांना 'अनारी'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. भालजी पेंढारकर यांनी बनवलेले नेताजी पालकर (1938), न्यू हाना पिक्चर्सचे संत दामाजी, नवयुग चित्रपतचे अमृत, व्हीएस खांडेकर लिखित आणि छाया फिल्म्सचे गोरा कुंभार यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या इतर संस्मरणीय भूमिका अनारी (1959), श्री 420 आणि मिस्टर अँड मिसेस 55 होत्या. रामानंद सागर यांच्या रामायणमधील मंथरा ही त्यांची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. 


1955 : अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन


आपल्या सापेक्षतेच्या सिद्धांताने विश्वाची अनेक रहस्ये उकलणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन (Albert Einstein) यांचं आजच्या दिवशी म्हणजे 18 एप्रिल 1955 रोजी निधन झालं. आइनस्टाईन हे वस्तुमान, ऊर्जा आणि वेगाचे समीकरण E=mc² साठी ओळखले जातात. अल्बर्ट आईनस्टाईन  यांनी सापेक्षतावाद सिद्धांत (The theory of relativity) मांडला. आइनस्टाईन यांना फोटोइलेक्ट्रीक इफेक्टसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 1999 मध्ये टाईम मासिकाने त्यांना द पर्सन ऑफ द सेंच्यूरी (The Person Of The Century)  म्हणून गौरवण्यात आलं आहे. आइन्स्टाईन यांनी 300 हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. 5 डिसेंबर 2014 रोजी, विद्यापीठे आणि संग्रहणांनी 30,000 हून अधिक अद्वितीय आइन्स्टाईन डॉक्युमेंट्स आणि लेटर्स प्रदर्शित करण्याची घोषणा केली. आइन्स्टाईन यांच्या बौद्धिक कर्तृत्वाने आणि वेगळेपणामुळे 'आइन्स्टाईन' हा शब्द 'बुद्धिमान' असा समानार्थी बनला आहे.


1962 : हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म


हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री पूनम धिल्लन (Poonam Dhillon) यांचा जन्म 18 एप्रिल 1962 रोजी झाला. त्यांनी थिएटर आणि टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांनी 1978 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला. 1979 मध्ये नूरी, रेड रोज, दर्द, निशान, जमाना, सोहनी महिवाल (1984), तेरी मेहेरबानिया (1985), समुद्र (1986), सावेरे वाली गाडी या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली.  कर्म (1986), नाम (1986), मलामाल (1988) इ. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. पूनम धिल्लन यांनी 2009 मध्ये बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. 


1980- झिम्बाब्वेने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले.


1991- केरळला देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य घोषित करण्यात आले.


1992- वर्णभेदामुळे बंदी घालण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने 1970 नंतर पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला.


1994- वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा याने इंग्लंडविरुद्ध एका दिवसात 375 धावा करून सर गारफिल्ड सॉबर्सचा विक्रम मोडला.