मुंबई : ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD - इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) व्यक्त केला आहे. आयएमडीने जून महिन्यात जाहीर केलेल्या माहितीमध्ये मान्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर ऑगस्ट महिन्यात 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. आयएमडीने गुरुवारी (1 ऑगस्ट) दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातही जून महिन्यातील सर्वसाधारण पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे.


आयएमडीकडून प्रिन्सिपल कम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) आणि मान्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीमनुसार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पावसाच्या हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसापैकी 49 टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो.

अल निनोचा प्रभाव कमी
भारतीय हवामान विभागाने आपल्या पहिल्या अंदाजात सामान्य पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. यंदा अल निनोचा जोर कमी असेल आणि तो हळूहळू कमी होईल. यंदा सामान्य म्हणजेच पावसाचा अंदाज आहे. यात 5 टक्के पाऊस कमी किंवा जास्त होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले होते.

काय आहे अलनिनो? 
पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढते या घटनेला अलनिनो म्हटले जाते. ही घटना दक्षिण अमेरिकेतील पेरु या देशाच्या समुद्रकिनारपट्टीवर दिसते. मागील काही वर्षांपासून पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत आहे. अलनिनोमुळे समुद्राच्या वाऱ्यांची दिशा बदलते. परिणामी पर्जन्यक्षेत्रात पाऊस पडत नाही. याउलट ज्या परिसरात पाऊस पडत नाही, तिथे मुसळधार पाऊस पडतो.

सरासरी पाऊस म्हणजे किती? 
887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.
गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.
देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.
2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.