छत्रपती शाहू महाराजांनंतर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एका ब्राह्मणाला जन्म घ्यावा लागला : महादेव जानकर
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2019 02:43 PM (IST)
मराठा समाजातीळ केवळ दोन टक्के लोक श्रीमंत असून त्या समाजाला आरक्षण देणे गरजेचे होते. मराठ्यांना दिलेले आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या कोट्याला फटका बसणार आहे, असा चुकीचा प्रचार काही मंडळी करत आहेत, असे जानकर म्हणाले.
पंढरपूर : छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण दिले होत. मात्र त्यानंतर पुन्हा छत्रपतींच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राह्मणाला जन्म घ्यावा लागला, असे वादग्रस्त विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. या विधानामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे . एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणात मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले आहे, असे सावधान वक्तव्य केले असताना जानकर यांनी केलेले वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत भर घालणारे आहे. माढा तालुक्यातील अरण येथे झालेल्या सावता परिषदेत बोलताना महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केले. मराठा समाजातीळ केवळ दोन टक्के लोक श्रीमंत असून त्या समाजाला आरक्षण देणे गरजेचे होते. मराठ्यांना दिलेले आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या कोट्याला फटका बसणार आहे, असा चुकीचा प्रचार काही मंडळी करत आहेत, असे जानकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे सांगत यासाठी जगातील सगळ्यात महाग वकील नेमल्याचे त्यांनी सांगितले. तो वकील तासाला दोन कोटी रुपये फी घेतो असेही जानकर म्हणाले. बोलण्याच्या ओघात जानकर यांनी नको ती गुपितेही सार्वजनिक ठिकाणी बाहेर आणल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.