मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.


मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं.  


रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.


मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होत आहे. येत्या दिवसभरात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


मुंबई उपनगरातील काही भागात पावसाच्या पाण्यामुळे टू व्हिलर गाड्या वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आल्याने आज दिवसभर लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अंधेरीच्या अनेक भागात पाणी साचलं आहे तर कांदीवलीमधील काही भागातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.


मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खूप वर गेली 3.3 मीटर अशी धोक्याची पातळी आहे. मात्र आता मिठी नदीचे पाणी 4.2 झाले आहे, म्हणजे ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.


रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


महत्वाच्या बातम्या