मुंबई : येत्या 23 जानेवारीला म्हणजे उद्याच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईत महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या राजकारणाची कूस बदलू शकतात. कारण राज ठाकरेंचा पुढील अजेंडा भगवा आहे. राज ठाकरेंच्या पक्षाच्या नवीन ध्वजाचे फोटो एबीपी माझाला मिळाले आहेत. मनसेने निवडणूक आयोगाला दोन नवे प्रस्तावित ध्वज पाठवले आहेत. एका ध्वजावर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन आहे तर दुसऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. विशेष म्हणजे दोन्ही झेंड्यात फक्त आणि फक्त भगव्या रंगाला स्थान आहे.


मनसेच्या सध्याच्या झेंड्यामध्ये पाचरंग आहेत. या झेंड्याच्या मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूला हिरवा रंग आहे. परंतु मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदलणार असल्याचं चर्चा आहे.

मनसेच्या राजकारणाची दिशा बदलणार, पक्षाचा झेंडा भगव्या रंगात रंगणार?

मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. कदाचित शिवसेना ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे हा पक्ष स्थापन होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु या 14 वर्षांमध्ये मनसेच्या वाट्याला यशापेक्षा अपयशाचे झेंडेच हाती घ्यावे लागले आहेत. 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 आमदार निवडून आणले. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई महापालिकांमध्येही मनसेला मोठं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांचे दारुण पराभव झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेची आणखीच अधोगती झाली. विधानसभेत एकच आमदार निवडून आला. विविध महापालिका निवडणुकीतही फारसं यश मिळालं नाही.

सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत का? हे 23 जानेवारीला मनसेच्या महाअधिवेशातच कळेल.