ठाणे: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने निविदा देखील मागवल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी रस्ता बनवण्याचा एक प्रकल्प असून दुसरा प्रकल्प फाउंटन हॉटेल ते थेट भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बनवण्याचा आहे. 


गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) बघायला मिळते. सध्या या ठिकाणी टू बाय टू रस्ता असून त्यावरील खड्डे आणि मध्येच येणारा घाट यामुळे वाहतूक कोंडी असते. यावर उपाय म्हणून थेट भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कसा असेल भुयारी मार्ग? 


या भुयारी मार्गात दोन्ही दिशेला प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिका असतील. यातील मुख्य भुयारी मार्ग हा साडेतीन किलोमीटरचा असेल. भुयारी रस्त्याची लांबी 5.5 किमी असेल. या प्रकल्पासाठी 41. 14 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. दुसरीकडे फाउंटन हॉटेल ते भाईंदर हा रस्ता देखील नेहमीच वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरतो. याठिकाणी फाउंटन हॉटेलपासून भाईंदरला जाण्यासाठी एक उन्नत मार्ग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता 9.8 किमी लांबीचा असेल तर यावर दोन्ही दिशेला चार चार मार्गिका असतील. यासाठी 28.48 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. वर्सोवा ते भाईंदर हा कोस्टल रोड तसेच ठाणे शहरातील कोस्टल रोड प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर गायमुख ते भाईंदर पर्यंत वाढणारी वाहन संख्या लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून पुढच्या चार ते पाच वर्षात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


ठाण्यात खासदार बाळ्यामामा म्हात्रेंच्या मालकीच्या ट्रकचा अपघात


ठाणे माजिवडा परिसरात ट्रक चालक व दुचाकीस्वाराचा  अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त ट्रक खासदार बाळ्यामामा यांच्या मालकीचा असल्याचे समजते. टेम्पो पंक्चर असल्याने गाडी थांबवली असता मागून येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली. त्याचवेळी या रस्त्यावर एका बाईकस्वाराचा अपघात झाला. 


या दोन्ही अपघातात दोन जण जखमी झाले असून धर्मेंद्र यादव आणि , सुनील बाकरे असे जखमींची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून २७ वर्षीय वैभव डावखर असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहने पोलीस कर्मचाऱ्यांकडून टोईंग वाहनाच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.


आणखी वाचा


कोट्यवधींची खैरात होऊनही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम; आता पादचारी मार्गासाठी 25 कोटींचा प्रस्ताव