Prakash Ambedkar : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या समोरील अजेंडे संपले आहेत. त्यामुळं आता समाजात भीती निर्माण करणे आणि जातीय ध्रुवीकरण करत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी धडपड चालू असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. यावर येत्या काही दिवसात एकत्र येऊन विजय मिळवता येईल असेही ते म्हणाले. आंबेडकर हे लातूर (Latur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 


लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे अत्याचारग्रस्त तापघाले कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आर्थिक देवाण घेवाणीमधून दलित तापघाले कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. 
 
आता हे जास्त काळ टिकणार नाही


आजमितीला देशात जातीय ध्रुवीकरण तयार करुन भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यातून भाजपला पुन्हा सत्ता प्राप्त करण्याचा मार्ग सुकर वाटत आहे. अतिशय क्रूर प्रकारे हिंसा केली जात असल्याचे आंबेडकर म्हणाले. तसेच लव्ह जिहाद, हिजाब यावरील मते तयार केली जात आहेत. मागील नऊ वर्षापासून हे सुरु आहे. आता हे जास्त काळ टिकणार नाही. आता काही दिवस हा त्रास आहे. निकाल लवकरच लागेल असेही आंबेडकर म्हणाले.


महविकास आघाडीत लवकर निर्णय नाही झाला तर ...


महविकास आघाडीत लवकर निर्णय नाही झाला तर अनेक प्रश्न निर्माण होतील असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आजमितीला महाराष्ट्रामध्ये तेलंगणा प्रवेश करत आहे. बीआरएस पक्षाची सभा आता नागपुरात होत आहे. उद्धव ठाकरे सोडले तर आघाडीतील इतर पक्षाची अवस्था काय? हे सगळ्यांना माहिती असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Majha Maha Katta : कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोण आहे हे कोणालाच माहित नव्हतं, टोपणनावाने ओळखलो जायचो : प्रकाश आंबेडकर