Agriculture News Latur : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. त्यावर मात करुन शेती करावी लागते. पण अशात देखील काही तरुण शेतकरी शेतीत नव नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. लातूर (Latur)  जिल्ह्यातील अशाच एका तरुणानं नोकरी सोडून उत्तम प्रकारची प्रयोगशील शेती केली आहे. अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद गावातील संतोष सारोळे (Santosh Sarole) असे या शेतकऱ्याचं नाव आहे.


शासनाच्या योजनांचा अभ्यास


संतोष सारोळे यांनी बीई, एमबीए चे  शिक्षण घेतले आहे. पुण्यात एका मोठ्या शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. मात्र, त्यांनी विचार करुन, पुढचे सगळे नियोजन आखून नोकरी सोडून शिरुर ताजबंद या आपल्या गावी शेती करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षे त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाला नियोजनाची जोड दिली.  त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास केला.  मायक्रो प्लॅनिंग करुन कुठली योजना कुठे फीट बसते याचा त्यांनी योग्य अभ्यास करुन त्याचा फायदा मिळवला.




सुरुवातीला जरबेरा फुलाची लागवड 
 
सुरुवातील संतोष सारोळे यांनी 60 टक्के सबसिडी घेऊन पॉली हाऊस टाकले. हे करताना यामध्ये काय घ्यायला हवं. याचे लॉजिस्टिक कसं असेल याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला. सुरुवातीला त्यांनी जरबेरा फूल लावले.  मार्केटचा अभ्यास करताना त्यांनी पुण्यात गौरी गणपतीच्या काळात, हैद्राबादमध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये फुलांची विक्री केली. कारण या दिवसात उर्वरित महाराष्ट्रात ऑफ सिझन असतो. तर हैदराबादमध्ये मोठे कार्यक्रम होतात. मग इतर वेळेस त्यांनी नांदेडच्या लोकल मार्केटमध्ये देखील किरकोळ विक्री केली.  लॉजिस्टिकवर खर्च न करता व्यवस्थित पॅकिंग करुन ट्रॅव्हल्सनी अत्यंत कमी खर्चात बॉक्स पाठवून त्यांनी फुलांची विक्री केली. 




हैदराबादला फुलांची विक्री


हैदराबादला शिरुरवरून ट्रॅव्हल्स जात नाहीत. मग ते उदगीरपर्यंत माल पोहच करुन तिथून ट्रॅव्हल्समधून पाठवतात. जरबेरा लागवड फलद्रूप झाली आणि फक्त दोन सिझनमध्ये त्यांची बँकेच्या कर्जातून मुक्तता झाली.  पुढे कोविड आला त्या काळात त्यांना फटका बसला. 


पाण्याची बचत


दरम्यान, संतोष सारोळे यांनी भरमसाठ लाईट बिल वाचवण्यासाठी मेडाच्या सबसिडीवर पाच एचपी ची मोटार चालेल एवढ्या क्षमतेच सोलार घेतलं. त्यामुळं त्यांची पैशांची बचत झाली. पावसाळ्यात पडणारे पाणी देखील त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पॉली हाऊसवर पडणारे पाणी, पणाळावाटे जाणारे पाणी त्यांनी एकत्र करुन एका बोरवेलमध्ये सोडायाचे नियोजन केलं. त्यामुळं इतर पाण्याची वणवण असतानाही त्यांच्या बोरला उन्हाळ्यातही पाणी होतं. त्या पाण्याचे योग्य नियोजन करुन सगळं पॉली हाऊस हिरवं राहिल्याची माहिती संतोष सारोळे यांनी दिली. नोकरी सोडताना मोठी जोखीम अंगावर घेऊन शेतात उतरलो होतो. आता मात्र मागे फिरुन पाहत नाही. आता दुसऱ्या शेतात जेरीनियम लावले आहे. इतरांची उदाहरणं फेलची आहेत पण मी नियोजनाने यात पण शंभर टक्के यश मिळवेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झेंडू व गलांडा फुल शेतीमधून चांगला फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.





शासनाच्या योजनेचे फायदे 


सामूहिक शेततळं



3 लाख 39 हजार रुपये शासनाचे अनुदान.
दुष्काळी परिस्थितीमध्ये शेततळ्यामधील पाण्याचा वापर  करून साडेतीन एकर पपई शेती मध्ये, 21 लाख रुपयाचे उत्पन्न.


पॉली हाऊस 


खर्च 42 लाख रुपये


शेड उभारणी, आतील माती, लागवड खर्च, रोपे इत्यादीसाठी 42 लाख रुपये खर्च. त्यामध्ये 30 लाख रुपये बँक ऑफ इंडियाचे कर्ज. दीड वर्षामध्ये पूर्ण कर्ज परतफेड केले. यामध्ये एनएचएम योजनेअंतर्गत 13 लाख 60 हजार रुपये अनुदान मिळाले. उर्वरित रक्कम उत्पन्नामधून परतफेड केल्याची माहिती संतोष सारोळे यांनी दिली. 


 जिरेनियम शेती


यावर्षी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यास गेलो असता अहमदनगर जिल्ह्यातील आंबळे येथील मच्छिंद्र चौधरी यांची सुगंधी वनस्पती जिरेनियमच्या शेतीची माहिती मिळाली. त्यानंतर ती शेती पाहून त्याची लागवड केल्याचे संतोष सारोळे यांनी सांगितलं. यातबरोबर टरबूज, खरबूज शेती, मिरची व शिमला मिरची शेती देखील केली आहे. 




 नर्सरी 


पॉली हाउसमध्ये  लॉकडाऊनच्या कालावधीत भाजीपाला नर्सरी उभारली होती. तसेच केशर आंबा नर्सरी देखील उभारली आहे. 


जेरेनियम डिस्टिलेशन प्लांट 


यावर्षी जेरेनियम डिस्टिलेशन प्लांट शिरुर नळेगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी याच्या अंतर्गत शिरुर ताजबंद येथे उभा केला. यासाठी 19 लाख 38 हजार रुपयांचा खर्च आला. यामध्ये 11 लाख तीस हजार रुपयांचे अनुदान पोखरा योजनेअंतर्गत मिळाले. शेतात अपयशाचे शेकडो उदाहरण असताना असे योग्य सूक्ष्म नियोजन करुन संतोष यांनी लाखो रुपये पदरात पाडून घेतले. शासनाच्या योजनांचा अभ्यास करुन त्याचा कुठे-कुठे वापर करायचा याचे बारकावे ठरवून त्यांनी शेतीत प्रगती केली. महिन्याच्या महिन्याला पगार देणारी सुखवस्तू असलेली नोकरी सोडून शेती करणारे संतोष सारोळे हे सर्वांसाठी एक आदर्श शेतकरी ठरले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: