लातूर: शहरातील कापड गल्लीत असलेल्या एका तीन मजली दुकानाला आग (Latur Fire) लागली आहे. अरुंद गल्लीबोळामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पथकाला पोहोचताना अनंत अडचणी येत होत्या. या आगीत कापड दुकानातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आग लागलेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचण येत आहे. 


लातूर शहरातील गंजगोलाई भागात सोळा मुख्य रस्ते आणि अनेक लहान मोठ्या रस्त्यांचं जाळ आहे. या प्रत्येक रस्त्यावर विविध प्रकारची दुकानं आहेत. यातच कापड गल्ली भागातील पूनम मॅचिंग क्लाथ सेंटरला आज रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. तीन मजली दुकानाच्या वरच्या मजल्यावरून आगीला सुरुवात झाली होती. आग लागल्यानंतर या भागाचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. यावेळी दुकानातील सर्व कर्मचारी बाहेर आले. सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणामध्ये दुकानातील माल जळून खाक झाला आहे.


अरूंद गल्ली असल्याने अग्निशनम दलाला अडचणी


आगीच्या घटनेची माहिती कळताच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. मात्र अरुंद गल्ली असल्याकारणाने अग्निशमन दलाच्या गाडीस गल्लीत प्रवेश करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या भागात पसरल्याने बघ्यांची गर्दी वाढत गेली. अरुंद गल्ली बोळ त्यात अग्निशमन दलाची गाडी आणि वाढणारी गर्दी यामुळे प्रशासनाला आगीवर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे.


कापड गल्लीतील तीन मजली दुकानाला आग लागल्याने त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक दुकानदारांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांच्या दुकानातील विद्युत पुरवठा बंद केला होता. रविवार असल्याकारणाने अनेक दुकानं बंद होती. आगीची माहिती कळताच या भागातील दुकानदारांनी आपापल्या दुकानाकडे धाव घेतली.


दोनच दिवसांपूर्वी लातूरमध्ये एका तीन मजली घराला आग लागून तीन लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आता तीन मजली कापड दुकानाला आग लागल्याने प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केलं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र याआगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 


अरुंद गल्ली,लोकाची गर्दी आणि मोबाईल कॅमेरे


शहराचा मुख्य भाग असलेल्या गंजगोला येथील कापड दुकानाला आग लागल्या कारणाने या भागात असलेल्या अनेक लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आगीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रत्येक जणांचा मोबाईल कॅमेरा सुरू होता. अरुंद गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाल्याकारणाने प्रशासनाला आगीवर नियंत्रण करण्याऐवजी लोकांवर नियंत्रण ठेवणं अवघड झालं होतं.


ही बातमी वाचा: