Inflation :  फोडणीच्या जिरे मोहरे आणि मसाला पासून ते गहू, ज्वारीपर्यंत सर्वच अन्नधान्यांचे भाव अवघ्या एका महिन्यातच वाढले असल्याचे दिसून आले आहे. ज्या कुटुंबाचं किराणाचं बजेट अडीच ते तीन हजार रुपये होतं. त्यांचे बजेट आता साडेचार हजार रुपयांच्या घरात गेले आहे. यामुळे आता किराणा भरताना सामान्यांना काटकसरी तरी नेमकी कुठं करायची असा प्रश्न पडला आहे. 

जसा अधिक महिना सुरू झाला त्यावेळेस पासून किराणा मालाचे दर हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील पंधरा ते वीस दिवसांमध्ये किराणा मालाच्या जिन्नसात मोठी भाव वाढ पहावयास मिळत आहे. डाळीमध्ये पाच ते दहा रुपयाची वाढ होताना दिसत आहे. तांदूळ, पोहे, शेंगदाणे आणि गहू या जिन्नस मधील भाव वाढ ही  10 ते 25 रुपयांपर्यंत दिसून येत आहे. 

अचानकपणे किराणा मालाचे भाव किलोमागे 10 ते 15 रुपये वाढल्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या खिशाला जास्तीचा ताण पडत आहे. किराणा सामनाचे बजेट बिघडल्याने महिन्याचा खर्च चालवताना दाम्पत्यांच्या नाकीनऊ येत आहेत. 

प्रति किलोमागे किती रुपयांची दरवाढ?

 

अन्नधान्य आधीचे दर प्रति किलो आताचे दर प्रति किलो
तूर डाळ 110 रुपये  165
मूग डाळ  110 रुपये  125 रुपये
चणा डाळ 65 रुपये 72 ते 75 रुपये
उडीद डाळ 106 रुपये  122 रुपये
शेंगदाणे  110 रुपये  158 रुपये ते 160 रुपये
जाड पोहे  35 रुपये 54 रुपये
साखर 38 रुपये  42 रुपये
मोठी ज्वारी  40 रुपये 55 रुपये
कोलम तांदूळ 50 रुपये  65 रुपये
गहू  36 रुपये 46 रुपये
मोठी बडीशेप 300 रुपये 750 रुपये

दरवाढीचा परिणाम हा इतर वस्तूंवरदेखील झाला आहे. कपडे धुण्याचे साबण, पावडरच्या दरातही वाढ झाली आहे. त्यातच भाजीपाल्याचे दरही चांगलेच वाढले आहेत. या वाढलेल्या दरामुळे सामान्यांचे बजेट मात्र बिघडले आहे.