Kunnur To Kedarnath Cycle Rally: सीमाभागातील निपाणी तालुक्यातील कुन्नूर येथील पंचविशीतील दोन ध्येयवेड्या तरुणांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकलवारी करत थेट केदारनाथला जाण्याचा निर्धार केला आहे. प्रथमेश प्रमोद करडे (वय 21) आणि शिवराज सुधाकर पाटील (वय 25) अशी या तरुणांची नावे आहे. मजल दरमजल या दोघा तरूणांनी गेल्या नऊ दिवसांच्या प्रवासात मध्य प्रदेश पार केले आहे.


बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कुन्नूर ते केदारनाथ हे 2200 किमी अंतर आहे. पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवडीचा संदेश हे दोन तरुण या सायकलवारीच्या माध्यमातून देणार आहेत. देशातील वृक्षांची बेसुमार कत्तल होत असताना सायकलने या तरुणांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी निवडलेला मार्ग पाहून गावकरीसुद्धा भारावून गेले आहेत. त्यांच्या उपक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. 


Kunnur To Kedarnath Cycle Rally: 22 मेपासून उपक्रमाला सुरुवात 


प्रथमेश आणि शिवराज यांनी 22 मे पासून केदारनाथ यात्रेला सुरुवात केली आहे. केदारनाथपर्यंत ते 2200 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 2200 किमीच्या प्रवासासाठी दिवसाला 100 ते 125 किमी सायकल प्रवासाचे नियोजन त्यांनी केले आहे. दररोज पहाटे पाचला सायकलवारी सुरु केल्यानंतर दिवसाला साधारण सव्वाशेच्या किमीपर्यंत अंतर पार केलं जातं. दुपारी जेवण करून विश्रांती घेतली जाते आणि त्यानंतर दिवसातील प्रवासाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी परत प्रवासाला सुरुवात केली जाते. त्यांनी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 160 किमी अंतर पार केलं होतं.  


कोल्हापूर आणि बेळगावमधील धार्मिक आणि पर्यटनस्थळी सायकलने प्रवास 


या आधी प्रथमेश आणि शिवराजने कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच धार्मिक आणि पर्यटनस्थळांची सायकल वारी केली आहे. त्यामुळे त्यांनी आता कुन्नूर ते केदारनाथ प्रवास करण्याचं निश्चित केलं. त्यांनी प्रवास करत पर्यावरण संवर्धन तसेच वृक्षारोपण संदेश देण्याचे स्वप्न पाहत ते पूर्ण करण्यासाठी विडा उचलला आहे. या दोन ध्येयवेड्या तरुणाचं कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागातून कौतुक केलं जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या