Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले की, आमच्या काँग्रेस 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा आम्ही जिंकल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात आम्ही पोहोचलो आहोत

Satej Patil on Hasan Mushrif: राज्यात भाजपविरोधात कणखरपणे काँग्रेस लढत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रतेची जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसत आहे, मात्र ते महायुती म्हणून लढले आहेत. हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते तर कदाचित विचार करता आला असता. मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू, असे सूचक वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले.
जिल्ह्यात काँग्रेस वाढवणं माझी जबाबदारी
कोल्हापुरात झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून 20 जागा पटकावल्या आहेत. तर काँग्रेस 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सतेज पाटील म्हणाले की, सहकारातील समीकरणे वेगळी आहेत. जिल्हा बँक किंवा गोकुळ अशा संस्था टिकल्या पाहिजेत. म्हणून मागे आम्ही पक्षविरहित आम्ही निवडणूक लढवल्या. मात्र आता माहित नाही. जिल्ह्यात काँग्रेस वाढवणं माझी जबाबदारी आहे, काँग्रेसच्या विचाराचा वर्ग कोल्हापुरात आहे. अजून विधानपरिषदेचे दोन वर्ष माझी बाकी आहेत, मी पुढे कसं निवडणूक लढवणार हे आता सांगू शकत नाही, तोपर्यंत हे सरकार राहील नाही राहील माहित नाही.
बिगर सत्तेतील आमचा पक्ष
निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले की, आमच्या काँग्रेस 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा आम्ही जिंकल्या आहेत. घवघवीत यश जरी नसले तरी प्रत्येक तालुक्यात आम्ही पोहोचलो आहोत. तीन सत्ताधारी पक्ष आणि बिगर सत्तेतील आमचा पक्ष आहे. मात्र, सत्तेमुळे काहीजण तिकडे गेले आहेत, सत्तेमुळे त्यांना हे यश मिळालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सत्तेचा प्रभाव पहायला मिळत असतो, तेच आता पहायला मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, स्व. अजितदादांच्या निधनानंतर सहानुभूतीचा उपयोग राष्ट्रवादीला निश्चित झाला. कदाचित दादा असते तर अजून यश त्यांना मिळालं असतं.
त्यांना आत्मचिंतन करावं लागेल
दरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांच्या मुलाचा पाडळी खूर्द मतदालसंघातून पराभव झाला. याबाबत ते म्हणाले की, विश्वास आबाजी पाटील, राजू सूर्यवंशी काँग्रेस मधून उभारले असते तर कदाचित निवडून आले असते. नरके गटातील लोकांना देखील ऐनवेळी आबाजी आल्यानंतर कदाचित ते पटलं नसेल, त्यांना आत्मचिंतन करावं लागेल. शेवटी झेडपी, पंचायत समिती स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत. मतचोरी, मतदार यादीतील घोळ याबाबत काँग्रेसची भूमिका आहे, परंतु आत्ताच्या निकालात अशा गोष्टी कुठे समोर आलेल्या नाहीत.
शक्य तिथे आघाडी, शक्य तिथे एकटे लढा
दरम्यान, काँग्रेसच्या राज्यव्यापी भूमिकेवर ते म्हणाले की, आमची पक्षाची बैठक 18 तारखेला मुंबईत होत आहे, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निकाल आणि राज्यातील काँग्रेसची पुढील भूमिका यावर चर्चा होईल, महाविकास आघाडीबाबत निर्णय त्यानंतर जाहीर करु. वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की शक्य तिथे आघाडी, शक्य तिथे एकटे लढा, असे त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या























