Kolhapur Direct Pipeline: कोल्हापूर शहरासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी (Kalammawadi) धरणातून 53 किमी थेट पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या 20 किमीची चाचणी यशस्वीपणे पार पडल्यानंतर पुढील चाचणी सुरु करण्यात आली आहे. ही चाचणी सुरु असतानाच अर्जुनवाडा फाट्याजवळ एअर व्हॉल्व्हला भगदाड पडल्याने रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाया जाऊन सचिन केरबा पाटील यांच्या शेतीचे नुकसान झाले. पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 


एअर व्हॉल्व्हचे लॉक तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात पाण्याचे फवारे उडाले होते, पाण्याचा दाब खूप असल्याने खड्डाही पडला. पाईपला एअर व्हॉल्व्हसाठी पाइप कट करून ठेवण्यात आली होती, पण वेल्ड करण्यात आलं नव्हते. दरम्यान, काळम्मावाडी ते पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 53 किमी पाईपलाईन जोडून पूर्ण करण्यात आली आहे. काळम्मावाडी धरणात पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले होते. जॅकवेलमध्ये पाणी पोहोचल्यानंतर पहिल्या 20 किमीची चाचणी करण्यात आली होती. 


काळम्मावाडी ते पुईखडी पाईपलाईन जोडून पूर्ण


भुयारी वीजवाहिनीसाठी खोदकाम करण्यात आलं आहे. वीजवाहिनीही लवकरच उपलब्ध होणार असल्याने ते कामही लवकर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. उपसा पंप बसवण्याचे काम सुरू आहे. एका जॅकवेलवरील दोन पंपांसाठी तयारी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या जॅकवेलवरीलही वेगाने काम सुरु आहे. 


योजनेतील सारी कामे ऑगस्ट अखेर पूर्ण होतील


दरम्यान, 9 जुलै रोजी थेट पाईपलाईनच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी काळम्मावाडी धरण परिसरात योजनेचं काम सुरु असलेल्या ठिकाणी पाहणी केली होती. त्यावेळी पाटील यांनी जॅकवेलवर पंप बसवण्यासह वीजवाहिनी, उर्वरित पाईपलाईनची स्वच्छता अशी थेट पाईपलाईन योजनेतील सारी कामे ऑगस्ट महिन्या अखेर पूर्ण होतील. त्यानंतर महिनाभर चाचणी घेतली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यामुळे दिवाळीपर्यंत पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, बिद्री साखर कारखान्याच्या आवारातून भूमीगत वीजवाहिनी नेण्याची परवानगी अध्यक्ष के. पी. पाटील आणि संचालक मंडळाने दिली आहे. त्यामुळे खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :